पालघर मध्ये ७१ कोटींचे पीककर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jul-2018
Total Views |


 

पालघर : खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकर्‍यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील ३२ हजार ६३ शेतकर्‍यांना १६० कोटी १२ लाख ३९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. या शेतकर्‍यांनी त्यांच्या २९ हजार ७८३ .०५ हेक्टर शेतीवरील पिकांसाठी हे अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे. नऊ दिवसांच्या शेतकरी मेळाव्याद्वारे बहुतांशी शेतकर्‍यांना पीककर्ज देण्यात आले.

 

आतापर्यंत पीककर्ज घेतलेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ६८५ शेतकर्‍यांनी १६ हजार ६७३ .९५ हेक्टर शेतांवरील पिकांवर ८९ कोटी ७ लाख ४६ हजारांचे पीक कर्ज घेतले. यामध्ये नियमित कर्ज भरणार्‍या ११ हजार ४९३ शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांनी ५२ कोटी ९६ लाख रुपयांच्या कर्जाचा लाभ घेतला आहे. या शेतकर्‍यांना टीडीसीसी बँकेने त्यांच्या ९ हजार ६५६ .१५ हेक्टरवरील पिकांवर कर्ज दिले आहे. कर्जमाफी झालेले, कर्ज सवलत दिलेले आणि प्रोत्साहनपर कर्जलाभ मिळवलेल्यांमध्ये ८ हजार १९२ शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांना ३६ कोटी ११ लाखांचा कर्जलाभ झाला आहे.

 

या पीककर्जाचा सर्वाधिक शेतकर्‍यांना लाभ घेता यावा, यासाठी टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुजहाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्या शिष्टमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यांत नऊ दिवस शेतकरी मेळावे घेऊन जागृती केली. या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्यात ४५ कोटी ८५ लाख कर्जवाटप केल्याचे त्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात मेळाव्यापूर्वी सुमारे आठ हजार ३१७ शेतकर्‍यांना ५३ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप केले होते. यामध्ये नियमित कर्ज भरणारे ७ हजार ३३४ शेतकरी असून, त्यांना ४२ कोटी १७ लाखांच्या पीककर्जाचा लाभ झाला आहे. ठाणे जिल्ह्यात वाटप केलेल्या ८९ कोटींप्रमाणेच पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ कोटी ४ लाख रुपये पीककर्ज १२ हजार ३७८ शेतकर्‍यांना वाटप केले आहे. याशिवाय, ८८ शेतकर्‍यांना ६७ लाख ९४ हजारांची कर्ज सवलत दिल्याचे टीडीसीसी बँकेने स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@