कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी महापालिकेचे दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे खा. कपिल पाटील यांनी केली. त्यावर “शहरातील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नगर अभियंत्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्यांवर चौकशीनंतर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही महापालिका आयुक्त बोडके यांनी दिली.
शहरातील खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. कपिल पाटील यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची आज भेट घेतली. यावेळी उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, वैशाली पाटील, रेखा चौधरी आदी उपस्थित होते. या वेळी खड्ड्यांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत खा. पाटील यांच्याबरोबरच नगरसेवकांनीही संताप व्यक्त केला.
शहरातील मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांमुळे सामान्यांच्या भावना तीव्र आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे पाच नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला. त्याची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. या संदर्भात दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी खा. कपिल पाटील यांनी केली. खड्डे भरण्याचे काम सुरू असताना, महापालिकेच्या अभियंत्यांना हजर राहण्यााचा आदेश द्यावा, अशी सूचना पाटील यांनी केली.