न्यूयॉर्क : येत्या २०२० पर्यत भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्येचा देश ठरणार असून देशातील तरुणाईच्या कौशल्यावरच भारताचे पुढील भवितव्य अवलंबून असेल असे मत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. जागतिक कौशल्य दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या एका अहवालामध्ये संयुक्त राष्ट्रांनी भारतातील तरुणाईविषयी आपले मत मांडले आहे.
भारतामध्ये सध्या प्रत्येकी तीन व्यक्तींमधील एक व्यक्ती ही तरुण असून त्या व्यक्तीचे वय हे साधारणतः १५ ते २४ या दरम्यान आहे. त्यामुळे येत्या २०२० मध्ये जगात सर्वात अधिक तरुणांची संख्या हे भारतामध्ये असणार आहे. यामुळे सरसरी वय हे २९ वर्ष इतके असणार आहे. त्यामुळे या देशातील तरुणांच्या कौशल्यावर तसेच त्यांच्या कर्तृत्वावरच भारताचे पुढील भवितव्य अवलंबून असेल, असे या अहवालामध्ये म्हटले गेले आहे. याचबरोबर देशातील तरुणांचा व्यक्तिमत्व विकास करण्यावर देखील भारताने अधिक भर दिला पाहिजे, असा सल्ला या अहवालामध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनेक वेळा देशातील तरुणांना कौशल्य प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये भारत सरकार देखील तरुणांच्या सोबत असून तरुणांसाठी स्कील इंडियासारख्या अनेक योजना देखील केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत.