घाटकोपर (पूर्व) येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. आठवले म्हणाले की, “सध्या सोशल मीडियामध्ये जे टीका करीत आहेत त्यांचे समाजात कोणतेही योगदान नाही. दोन समाजात गैरसमज पसरवून वाद लावण्याची, आंबेडकरी समाजाचे नुकसान करण्याची भूमिका ते घेतात. व्हॉट्सअॅपवर टीका करण्याएवढे सोपे काम चळवळीचे नाही,” असे ते म्हणाले. आंबेडकरी चळवळीत काम करणे अवघड आहे. चळवळ कशी उभी करायची, ती माझ्याकडून शिका मग माझ्यावर टीका करा, ” असे आव्हानही आठवले यांनी आपल्या टीकाकारांना दिले. ”रमाबाई आंबेडकर नगरवासीय माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच माझे नेतृत्व देशभर वाढले,” अशीही कृतज्ञतेची भावना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर आंबेडकरी चळवळीत घुसलेले नक्षलसमर्थक व आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा त्यांनी चालवलेला प्रयत्न हा एक डोकेदुखीचा मुद्दा ठरला आहे. गेले काही दिवस हे प्रचारतंत्र पद्धतशीररित्या राबवले जात असून यामुळे समाजमन मोठ्या प्रमाणावर कलुषित होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘घरचा आहेर’ दिल्याने आता या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.