मुंबई: डॉक्टरांचा सल्ला न घेता ऑनलाईन फार्मसीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सरकार यावर ठोस उपायोजना करत नसल्याने औषधविक्रेत्यांनी दि. १६ जुलैला वांद्रा-कुर्ला येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय सल्ला न घेता ऑनलाईन औषधांचे सेवन केल्याने त्याचा रूग्णांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ऑनलाईन औषध खरेदीचा प्रश्नावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने यासंदर्भात सरकार कोणती पावले उचलत आहेत? कोणत्या उपायोजना आखल्या आहेत? असे प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु अद्यापही त्यावर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. ऑनलाइन औषध विक्रीला कायदेशीररित्या मान्यता देण्यासाठी केंद्राने जलद हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी कायद्याचा मसुदाही तयार केला आहे. मात्र, तरीही एफडीएने याविरोधात स्पष्टपणे कोणतीही भूमिका का मांडली नाही, असा प्रश्न महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने उपस्थित केला आहे.