मुंबई : उच्च शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढत मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचे वाटप करण्याची सूचना दिली आहे. या निर्णयावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विरोधक तोंडसुख घेत आहेत. दरम्यान, प्रतिउत्तरात तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांना जाहीर करावं असे आव्हान दिलं आहे. यामुळे टीकाकारांचीच कोंडी झाली आहे.
विरोधकांनी केलेल्या उत्तरादाखल शिक्षणमंत्री म्हणाले कि, "भिवंडीची भक्ती वेदांत संस्था आमच्याकडे भगवदगीतेचे वाटप करावे अशी मागणी घेऊन आली होती. यामध्ये सरकारचा कुठलाही सहभाग नसून मोफत वाटप करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. याबाबत उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. जर मागणी झाली तर कुराण आणि बायबलचही वाटप करण्यात येईल".
काय आहे संपूर्ण प्रकरण
उच्च शिक्षण विभागाने मुंबई विद्यापिठांतर्गत नॅक मुल्यांकन अ/अ+ श्रेणी प्राप्त झालेल्या सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचे वाटप करण्याचे परिपत्रक काढले आहे. महाविद्यालयांनी या भगवदगीता लवकरात लवकर घेऊन जाव्या. तसेच भगवदगीतांचे वाटप झालेल्या महाविद्यालयांना पावतीही सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.