नवी दिल्ली : “मला माझ्या आजवरच्या राजकीय आयुष्यात योग्यतेपेक्षा फार जास्त मिळाले आहे. त्यामुळे मी कोणत्याही शर्यतीत नाही. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तर मुळीच नाही,”असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले आहे.
नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते. “आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्यास सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून आपल्याकडे बघितले जात आहे. हे खरे आहे का?,” असा प्रश्न विचारला असता गडकरी यांनी, “आपण कोणत्याही पदाच्या शर्यतीत नाही,” असे स्पष्ट केले. ”मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. केंद्रीय मंत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सहभागी होण्याची माझी इच्छा नाही,” असे सांगताना, “पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीतही भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्येक मंत्र्याला बोलण्याची संधी मिळते. अनेक जण वेगवेगळे मत मांडतात. मोदी सर्वांचेच ऐकतात. मोदी यांनी देशवासीयांना ’चांगल्या दिवसां’चे वचन दिले होते. ते चांगले दिवस आले आहेत काय?” असे विचारले असता, ”चांगले दिवस, याबद्दलचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. ही संकल्पना व्यक्तिनिहाय बदलते. लोकांच्या अपेक्षा सतत वाढत असतात. मात्र, भूतकाळातील कारभार आणि सध्या सरकारची कामगिरी यांची तुलना केल्यास फरक सहज लक्षात येतो,” असे गडकरी म्हणाले.