पावसाळ्याच्या काळात अनेक लोक धबधब्यांच्याकाठी पर्यटनासाठी जातात मात्र अनेकदा अशा परिस्थितीत दुर्घटना होतात. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे शासनाने रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येणाऱ्या धबधब्यांजवळ पर्यटनासाठी बंदी घातली आहे. दिवसेंदिवस वाढणारे अपघात कमी व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे येथील धोकादायक धबधब्यांच्या ठीकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलै पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई येथे पावसाने थैमान घातल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन अस्त व्यस्त झाले आहे. मात्र याकाळात देखील मुंबई पुण्याहून अनेक लोक पर्यटनासाठी धबधब्याच्या जवळ जातात, मात्र यामुळे अनेक अपघात होतात, तसेच नागरिकांनी काळजी न घेतल्यामुळे देखील अपघातांमध्ये वाढ होते, त्यामुळे नागरिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर आणि रायगड जिह्ल्यातील धबधब्यांजवळ पर्यटनास पुढील २ महीने बंदी घालण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी येथील पर्यटनस्थळांविषयी विचार करण्यात येईल असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.