मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नेटकऱ्यांना हास्यविनोदांसाठी आणखी एक विषय मिळाला आहे. यातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील पावसावरील हास्यविनोदांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियाच्या ट्विटर, व्हॉट्स अॅप आणि फेसबुक या लोकप्रिय माध्यमांमधून मुंबईतील पावसावरील हास्यविनोद फिरत आहेत. यामधून लाखो सर्वसामान्य, चाकरमानी आणि नोकरदार वर्गाचे होत असलेले हाल बघायला मिळत आहेत. या पावसामुळे मुंबईतील ठाणे, दादर, माटुंगा, वसई, विरार, नालासोपारा, घोडबंदर रोड, चर्नीरोड, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
या पावसामुळे रस्त्यांसोबतच रेल्वे वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. "पाणीच पाणी चोहीकडे" असे दृश्य सध्या संपूर्ण मंबईत पहायला मिळत आहे. त्यामुळे "मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झालीय" असं म्हणलं तर वावगं ठरु नये.