जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |

 
 
नागपूर : मागील वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी करणे गरजेचे आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. आम्ही गावोगावी फिरलो, शेतकऱ्यांना विचारले की कर्जमाफी मिळाली की नाही एकही शेतकरी उत्तर द्यायला तयार नाही. सांगताना मात्र सरकारने ऐतिहासिक, ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा अशी जाहिरातबाजी केली. सरकारने कर्जमाफीचा अर्ज घेण्यासाठी ऑनलाइन पद्धत काढली ती यंत्रणा व्यवस्थित चालली नाही. बँकांमध्ये आणि सरकारच्या कारभारात ताळमेळ नव्हता. एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. सरकारने दीड लाखाची तरी कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. पिकविमा योजनेचेही तीनतेरा वाजले आहेत. पिकविमा कंपन्यांवर सरकारचे लक्ष असायला पाहिजे. बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांना १ रुपया पिकविमा दिला आहे. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचीच फसवणूक तुम्ही करत आहात, असे म्हणत पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
 
 
पिकविमा कंपन्या स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे, असा आरोप पवार यांनी केला. शेतकऱ्यांना आता कर्जही मिळायला हवं पण सोसायटीचा सचिव शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहे. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. त्याच्या घरी आयाबहिणी नाहीत का? सरकार का अशांवर कारवाई करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा मुद्दा समोर आला पण असे अनेक प्रकार असू शकतात. सरकारने कायदा करावा, अशा लोकांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करा, अशी मागणी त्यांनी केली. डिसेंबर महिन्यात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना, तुडतुड्याग्रस्त शेतकऱ्यांना भाऊसाहेब फु़ंडकर यांनी मदतीची घोषणा केली होती. ती मदत अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. हे या सरकारचे अपयश आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे हे यातून स्पष्ट होत आहे, असेही पवार म्हणाले.
 
अजित पवार यांच्या विधानसभेतील भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ - 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीडपट हमीभावाची घोषणा केली. निवडणुकीच्या काळातही अशीच घोषणा करण्यात आली होती. म्हणून लोकांनी कमळाचे बटन दाबले. हे सरकार जुमला दाखवण्यात पटाईत आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावी. सरकार आपल्या पाठीशी उभे आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनात तयार करण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. केळी उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे, दुध उत्पादक शेतकऱ्यांना जसा दिलासा दिला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जसा दिलासा दिला त्याच प्रमाणे इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
बँकेच्या रांगेत एका वृद्ध शेतकऱ्याचा गर्दीत गुदमरून मृत्यू झाला. सरकारने महिलांसाठी वृद्धांसाठी काही कायदा करायला हवा. उपाययोजना करणे सरकारला जमत नाही. सरकारमधील लोकांना फक्त राजकारण जमतं. मागच्या दारांनी सहकार क्षेत्रात स्वतःची माणसे पाठवण्याचा रडीचा डाव सरकारमधील लोक करत आहेत. हिंमत असेल तर निवडणुकांच्या माध्यमातून या, कुरघोड्या कसल्या करता, असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना कापसाला ७ हजार प्रति क्विंंटल भाव द्यावा, अशी मागणी करत आता तुमचे सरकार आहे तर का देत नाही भाव असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाकडे कोणी नव्हते म्हणून इतर पक्षातून माणसे आणली. मनसेकडून आणली, राष्ट्रवादीकडून आणली, काँग्रेसकडून आणली. स्वतःचे लोक राहिले मागे, आमचेच लोक घेऊन सत्ताधाऱ्यांची पोटं मोठी झाली, असा टोला त्यांनी हाणला. जे गेले ते कुणाचे नाही. ते उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. उद्या आमच्याकडे सत्ता आली की हे परत येतील की नाही ते बघाच, नाही आले तर नावाचा अजित पवार नाही, असे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@