मुंबई : मुंबई येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सामान्यांचे जनजीवन विस्खळित झाले आहे. लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल तर उशीराने धावत आहेतच मात्र मुंबईच्या नालासोपारा आणि विरार यामध्ये वडोदरा एक्सप्रेस अडकल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. ट्रॅकवर पाणी तुडुंब भरल्यामुळे ही गाडी थांबली आहे. यामधील प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे.
अंधेरी येथून ट्रेन मध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी खाद्य पदार्थ पाठविण्यात येत आहेत. मुंबई येथे गेल्या दोन दिवसात ४०० मि.मि. पाऊस पडल्याने रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. हे पाणी इतके अधिक आहे, कि यामधून कुठल्याही रेल्वे गाडीला जाणे शक्य नाही. वडोदरा एक्सप्रेसच्या ट्रॅकवर देखील असेच पाणी साचल्यामुळे ही गाडी अडकली आहे.
मुंबई येथील भीषण पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणात गाड्या उशीराने धावत आहेत. मुंबई राजधानी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही गाडी रात्री ८ वाजता सुटेल. तसेच अनेक गाड्यांच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.