नागपूर : गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक असा पाऊस दि. ६ जुलै रोजी नागपूर येथे झाला. यावेळी आपत्ती व्यवस्थापनात पोलिसांची चांगली कामगिरी झाली असून शेकडो नागरिकांचे प्राण त्यांनी वाचविले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
नागपूर येथील ड्रेनेजची पाणी निचरा करण्याची क्षमता १२५ मिमी. आहे. त्यादिवशी २८२ मिमी.पाऊस पडला. त्यामुळे आपत्तीजनक स्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांची संपूर्ण नुकसान भरपाई केली जाईल. तसेच विधानभवनातील साचलेल्या पाण्याबाबत काय घडले याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य अजित पवार यांनी विधानसभेत याबाबत मुद्दे उपस्थित केले होते, त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली.