मुंबई :ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत. विशेषत: झोपडपट्टी परिसरामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली. तसेच हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ अंतर्गत २० ,११२ मुलांना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्याची महिती त्यांनी दिली.
विधान परिषदेचे सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२ , ५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १९ ,५०० व्यक्तींचा शोध लागला. यामध्ये १६ ते २५ वयोगटातील १६ ,२८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील १४ , १४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती ठरविण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्यांच्या आत हरविलेली मुले सापडले नाही, तर त्याबाबतचा तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षा’मार्फत करण्यात येतो. तसेच मुंबईतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.