मुंबईत जोरदार पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2018
Total Views |

गटारामध्ये पडून चिमुरड्याचा मृत्यू
अनेक ठिकाणी पाणी तुंबले
 

 
 
मुंबई : मुंबई व उपनगर परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. या दरम्यान मानखुर्द ट्रॅाम्बे येथे नाल्यात पडून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला. हिंदमाता, परळ, दादर, कुर्ला, वडाळा, शीव, वांद्रे, किंग्जसर्कल आदी भागात पाणी तुंबले. दरम्यान पाणी तुंबणार नाही, हा प्रशासनाचा दावा, पहिल्या पावसांतच फोल ठरल्याचे चित्र आहे.
 
गुरुवारी सकाळीच आकाशात ढग दाटून गडग़डाटासह पावसाने सुरुवात केली. पहिल्या तासाभराच्या पावसांतच काही ठिकाणी ३० ते ३५ मिमी पावसाची नोंद झाली. हिंदमाता, दादर टीटी, परळ टीटी येथे पाणी साचल्य़ाने प्रशासनाला येथे पंप लावून पाण्याचा निचरा करावा लागला. किंग्जसर्कल, साय़न, हिंदमाता व वांद्रे येथे बेस्ट वाहतूक काहीवेळ इतर मार्गावरुन वळवावी लागली. पहिल्याच पावसात ही स्थिती उद्भवल्याने मुंबईकरांमधून प्रशासना विरोधात संतापाच्या प्रतिक्रिया होत्या. गेल्यावर्षी २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पडलेल्या पावसांत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे यंदा तरी मुंबई तुंबू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल, असे मुंबईकरांना अपेक्षा होती. मात्र पहिल्या पावसांतच पाणी तुंबल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे. काही ठिकाणी मान्सून पूर्वीची रस्त्यांची कामेही अद्याप पूर्ण झालेली नाही, नालेही गाळात असल्य़ाने समाधानकारक पाऊस झाल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे चित्र आहे. मेट्रोच्या कामांमुळे खोदलेले खड्डे, नादुरुस्त झालेल्या जलवाहिन्या कामही अपूर्ण असल्य़ाने येथे पाण्य़ाचा निचरा होण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्य़ाने प्रशासनाने येथे पंप लावण्य़ाचा निणर्य घेतला आहे. त्यामुळे यंदाही तुंबई मुंबईला मुंबईकरांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.
 
तासाभरात पडलेल्या पावसाची नोंद
धारावी येथे २९ मी.मी, प्रभादेवी वरळी २७ मि. मी. ग्रान्टरोड, २० मिमी. कुर्ला १३ मिमी. वांद्रे २८ मिमी. चेंबूर १३ मि.मी गोरेगांव २६ मिमी. चिंचोली २५ मिमी, अंधेरी प. २० मिमी, मालाड १८ मिमी.
 
चिमुरड्याचा मृत्यू
ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरातील घरासमोर खेळत असलेला एक मुलगा तेथील नाल्यात पडला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. आदियान परवेज तांबोळी (वय २) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्याने नाव आहे.
 
पावसाच्या बळींची संख्या ४ वर
मुंबईत मान्सूनपूर्व पडलेल्या पहिल्याच पावसात भांडुप येथील खिंडीपाडा भागात विजेच्या तारेचा प्रवाह पाण्यात पसरल्याने दोन लहान मुलांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर मालवणी येथे नाल्यात पडलेल्या दोन मुलांना वाचविण्यात यश आले होते. त्यानंतर गुरुवारी ही घटना घडली. त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व पावसाच्या बळींची संख्या ४ वर गेली आहे.
 
चार ठिकाणी बस वाहतूक वळवली -
सायन पूर्वेकडील मार्ग क्रमांक २४ [साधना महाविद्यालय] जवळ पाणी तुंबल्यामुळे तेथील बस क्र ७ मर्या, २२ मर्या, ३० मर्या, ३०२, ३०५, ३१, ३४१, ३५२ या बसमार्गांचे प्रवर्तन सायन मार्ग क्र ३ वरून सुरु करण्यात आले. तर महेश्वरी उद्यान येथील बस वाहतूक महेश्वरी उद्यान उड्डाणपुलामार्गे करण्यात आली ५, ७ मर्या, ८ मर्या, ११ मर्या, १६ मर्या, १९ मर्या, २१ मर्या. २५ मर्या. २७, ३० मर्या. ६६. ८५. ९२ मर्या,१६५, २१३, ३०५, ३५१, ३५४, ३५७, ३८५, ३६८ मर्या, ४५३ मर्या, ५०४ मर्या, ५०६ मर्या, ५२१ मर्या या बसेस महेश्वरी उड्डाण पूल मार्गे सोडण्यात आल्या. तर हिंदमाता जवळ पाणी तुंबल्यामुळे येथील सर्व बससेवा हिंदमाता उड्डाणपूल मार्गे सोडण्यात आल्या. तर वांद्रे चित्रपटग्रुह येथे पाणी तुंबल्यामुळे वाहतूक बंद केल्यामुळे तेथील बस प्रवर्तन लिंकिंग रोड मार्गे वळवण्यात आली. परिणामी बस क्र. ४ मर्या, ३३, ८३, ८४ मर्या, ७९, २०२ मर्या., २२५, २४१ या बस मार्गांवरील बससेवा काही काळापुरती लिंक रोड मार्गे सोडण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@