मुंबईत मान्सून आल्याची वर्दी कालच्या पावसाने दिलीच आहे. मूळ मान्सून येण्यापूर्वी असा थोडासा शिडकावा होतच असतो. मात्र, या पावसालाच खरा मान्सून मानून डराँव डराँव करणार्या बेडकांच्या काही जाती असतातच. देशातल्या ‘राजकीय मान्सून’ विषयी बोलायचे तर तो खरे तर २०१९ ला येणार आहे. कर्नाटकातली जुळवाजुळवी म्हणजेच, मोदींचाच संपूर्ण पराजय असे वाटून अनेक बेडूक खुश झाले आहेत. देशभरातील राजकीय बेरोजगारांना कर्नाटकनंतर रोजगाराच्या संधी दिसू लागल्या आहेत. २०१४ ला केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते. लालू वगैरे सारख्यांचे तर दाणा- पाणी सोडाच, पण घरात राहाणेही अशक्य झाले होते. आजघडीला देशातील काही तुरळक राज्ये सोडली, तर संपूर्ण देशातच अशा असंतुष्टांच्या फौजा तयार झाल्या आहेत. गंमत म्हणजे, महाराष्ट्रातून या सगळ्यांना म्होरक्या मिळावा यापेक्षा मजेशीर काय असणार?
निमित्त आहे ते नरेंद्र मोदींच्या सरकारचे. युपीए-१च्या आधी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा ज्यांनी तापविला होता त्यात शरद पवार आघाडीवर होते. इतके की त्यांनी काँग्रेस सोडून नव्या पक्षाची स्थापना केली होती. पण, जसे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळाले, तसे पवार सरळ उठले आणि युपीएत सहभागी झाले. तेव्हा त्यांना सोनिया जाचत होत्या. मधल्या काळात जेव्हा राहुल गांधींचा अवाका उघडा पडायला लागला, तेव्हा काँग्रेसचे वाईट दिवस आले होते. विरोधकांच्या पोटनिवडणुकांमधल्या विजयांनी या सगळ्यांना वेगळे दिवस येतील असे वाटायला लागले आहे. ज्या राहुल गांधींनी आता थोडे समंजस व्हायला हवे, असे पवार सांगत आहेत, त्याच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची भविष्यवाणी पवार करू लागले आहेत. भाजपविरोधी सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण त्यांचे नेते होऊ शकतो, हे पवार सांगत आहेत. कारण, त्यांची पंतप्रधान होण्याची आकांक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे वाईट नाही, मात्र त्यासाठी उत्तम अधिष्ठानही असावे लागते. केवळ राजकीय जोड-तोड करून कुणालाही त्या पदापर्यंत पोहोचता आलेली नाही. देवेगौडा, गुजराल वगैरे जी मंडळी अशा लॉटर्यांचे धनी ठरले, त्यांना देशातील जनता कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी स्मरत नाही.
इथे खरे तर परिस्थिती उलटी आहे. इंदिरा गांधींच्या विरोधात जे एकवटले होते त्यात थोडे फार बरे तरी लोक होते. इथे या सगळ्यांचे शिरोमणी असलेले राहुल गांधी आहेत, त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या सोनिया गांधी आहेत. गावरान लालूंचा मुलगा ‘यशस्वी’ यादव आहे. पराभूत माया-मुलायम आहेत, लहरी ममता बॅनर्जी आहेत, सगळीकडूनच पाया उखडत चाललेले डावे आहेत. आता या सगळ्यांचे नेतृत्व पवार करणार आणि त्यांना भारताची जनता आपला कौल देणार, ही कल्पनाच मुळी हास्यास्पद आहे. २०१९ हे नरेंद्र मोदींचेच आहे हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. मात्र, सत्तेसाठी हे सगळे बेडूक कसे सरसावले आहेत आणि हे एकत्र कसे नांदणार, हे पाहाणे रंजक ठरेल.