'ती' बनली गरजूंची 'वॉटर मदर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2018   
Total Views |



 

कालपर्यंत ज्या भागातील लोक दुष्काळाच्या छायेखाली पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ होत होते, आज त्याच भागात बाराही महिने पाणी आहे. ही किमया आहे अमला रुईया यांच्या कार्याची...

यांना अध्यात्माची आंतरिक ओढ होती. पण, एका घटनेने ‘त्या’ खूप विचलित झाल्या व त्यांनी असे काम केले की, ज्यामुळे कालपर्यंत ज्या भागातील लोक दुष्काळाच्या छायेखाली पाण्याच्या एका थेंबासाठी व्याकूळ होत होते, आज त्याच भागात बाराही महिने पाणी आहे. आपल्या विचारांशी दृढ व नशिबाशी दोन हात करणार्‍या ७० वर्षीय अमला रुईया भलेही मुंबईत राहात असतील, पण त्यांनी आपल्या कामाने राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागाचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी पारंपरिक जलसंचयनाचा तांत्रिक पद्धतीने उपयोग करून २०० जलकुंड बनविले, ज्यामध्ये एक कोटी लिटर पाणी जमा होते. तसेच त्यांनी राजस्थान व दुसर्‍या राज्यातील अनेक ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त ‘चेकडॅम’ तयार केले, जिथे कधी काळी लोक पाण्यासाठी व्याकूळ होते. आज तिथे पाण्यामुळे हिरवळ तर आहेच व आसपासच्या सगळ्या विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत. आपल्या देशातील ६० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसामुळे काही भागात ओला दुष्काळ पडतो, तर काही भाग हा कोरडा राहातो. स्वातंत्र्यानंतर सरकारने या समस्येच्या निवारण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या. पण, परिस्थितीत काही विशेष फरक पडला नाही. पण, असे काही लोक आहेत, जे अशाप्रकारच्या योजनेला सत्यात परिवर्तीत करून दाखवतात, त्यांपैकीच एक आहेत अमला रुईया.

त्यांचे सासर राजस्थानच्या रामगढ जिल्ह्यातील शेखावटी भागातील. त्या सांगतात की, 'मला अध्यात्माची आवड आहे. नव्वदच्या दशकात जेव्हा राज्यस्थानमधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे हृदयद्रावक चित्र टीव्हीवर पाहिले, तेव्हा माझी या लोकांसाठी काही तरी करण्याची इच्छा जागृत झाली.' त्यावेळेस दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अल्पशा प्रमाणात का होईना, आनंद देण्यासाठी अमलाच्या सासऱ्यांनी टँकरने पाणीपुरवठ्याची व जेवणाची सोय केली. परंतु, या उपक्रमातूनही अमला रुईया यांना समाधान वाटले नाही. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, विपरीत परिस्थितीतसुद्धा येथील लोकांना त्यांचे जीवन सामान्यपणे जगता आले पाहिजे. अमला रुईया सांगतात की, 'मला काय काम करायचे आहे, याची कल्पना नव्हती व मी या बाबतीत खूप विचार केल्यावर असे लक्षात आले की, काही सामाजिक संस्था आहेत, ज्या या क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यांच्या कामाला मी आधार बनवून आपल्या कामाची सुरुवात केली. याची सुरुवात मी आमच्या पूर्वजांचे गाव शेखावटीपासून केली. हे थार मरूस्थलच्या जवळील एका समांतर जागेवरील ठिकाण आहे, जिथे पावसाचे पाणी जमीन शोषून घेते. अशातच आम्ही तेथे जलकुंड बनवण्याचा निर्णय घेतला, जो पारंपरिक पाणी साठवण्याचा उपाय आहे.'

 

अशाप्रकारे अमला रुईया यांनी त्या भागातील लोकांच्या मदतीने सन २००० मध्ये शेखावटी व त्याच्या आसपासच्या भागात राहाणार्‍या शेतकऱ्यांच्या शेतात २०० जलकुंड (शेततळे) बनवले. दोन-तीन तास पडणार्‍या पावसाने प्रत्येक कुंडात साधारणतः १६ हजार ते ५० हजार लिटरपर्यंत पाणीसाठा तयार होतो. विशेष गोष्ट म्हणजे, यामुळे येथे वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व स्त्रियांना घराजवळच वापरासाठी पाणी मिळू लागले आहे व त्या पशुपालनही करू लागल्या आहेत. तसेच दूध, दही, खवा इ. विकून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले आहे. अशाच प्रकारे अमला यांना जेव्हा राजस्थानातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कळले, तेव्हा त्यांनी अशा भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी 'चेकडॅम' बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी राजस्थानच्या 'निम का थाना' या भागाची निवड केली. कारण, हा भाग डोंगराच्या पायथ्याला होता व ‘चेकडॅम’ अशाच जागेवर तयार केले जातात, जिथे उंचावरुन पडणार्‍या पावसाचे पाणी एकत्र जमा होऊन खाली वाहून येते. दोनच तासाच्या पावसाने त्यांनी बनवलेले 'चेकडॅम' भरून वाहायला लागतात व त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या विहिरीतील पाण्याचा स्तर ८० फुटांपेक्षा खाली होता, तोच आता वाढून ३० फुटांपर्यंत आला आहे. यानंतर सदर ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वर्षातून दोन खरीप व रब्बी पिके घेऊ लागले आहेत. तसेच काही भागात पाणी आणखी जास्त असल्यामुळे शेतकरी भाज्या पिकवू लागले आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले व ते अतिरिक्त धान्य विक्री करू लागले. तसेच त्यांची पशुपालनाची आवडही वाढू लागली आहे.
 
अमला रुईया गर्वाने सांगतात की, 'ज्या भागात त्या काम करतात, तेथे गाव सोडून शहरात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे व जे लोक गाव सोडून गेले होते, ते परत गावात परतत आहेत. गावातील स्त्रिया आता घरी राहूनच काम करू लागल्या व त्यांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत.' हा अमला रुईया यांच्या प्रयत्नाचाच परिणाम आहे की, त्यांना आतापर्यंत राजस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणासारख्या राज्यात २१६ 'चेकडॅम' बनवण्यात यश आले आहे. अमला रुईया सांगतात की, या 'चेकडॅम'मुळे शेकडो गावातील लाखो लोकांना याचा फायदा झाला आहे. जलसंचयनाच्या कामाला योग्य प्रकारे आकार देण्यासाठी अमला रुईया यांनी 'आकार चॅरिटेबल ट्रस्ट' नामक एक संस्था सुरु केली. याच्या मदतीसाठी गावकरी नवीन जागेवर 'चेकडॅम' बनविण्यासाठी ३० ते ४० टक्के खर्च देतात व उर्वरित रक्कम सदर ट्रस्ट देते. अमला करत असलेले काम खूप मोठे आहे. अमला यांच्या कार्याला सलाम!
@@AUTHORINFO_V1@@