नाशिक : जिल्ह्यातील साडेबारा लाख सातबारा उतार्यांपैकी मे अखेर एक लाख सातबारा उतार्यांवर डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले आहे. सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कामात गती घेतली असून, जुलै अखेर हे काम पूर्ण करून, १ ऑगस्टपासून शेतकर्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल खात्याने राज्यातील सर्व गावातील शेतकर्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे गेल्यावर्षी जाहीर केले होते. यापूर्वी २०१७ मधील स्वातंत्र्यदिनापर्यंत राज्यातील सर्व गावांतील शेतकर्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे ऑनलाईन होणे अपेक्षित होते. सात तालुक्यातील काम शंभर टक्के पूर्ण झाले असून, अद्याप आठ तालुक्यांतील काम बाकी आहे.
सध्या सातबारा पुनर्संपादनाचे काम सुरू आहे. नाशिक, मालेगाव, इगतपुरी आणि निफाड तालुक्यात या कामात सर्वाधिक पिछाडीवर असल्याने या कामात विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जुलै अखेर काम पूर्ण करणार
निफाड, येवला, नांदगाव, इगतपुरी, मालेगाव, नाशिक, बागलाण तालुक्यातील सातबाराचे काम पिछाडीवर असल्याचे दिसून येते. या तालुक्यात सातबारा उतार्यांची संख्या अधिक असून, एकाच उतार्यावर अधिक जणांची नावे असल्याने नोंदणीची प्रक्रिया क्लिष्ट ठरत असल्याचे सांगितले जाते. सध्या एक लाख सातबारा उतार्यांवर डिजिटल स्वाक्षरी पूर्ण झाली असून, जुलै अखेर हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे.