‘‘काय हो तुमच्या पाच मुली कशा नक्षत्रासारख्या सुंदर, पण तुमची ही स्नेहलता इतकी कशी काळी? तुम्हाला जबरदस्त हुंडा द्यावा लागेल. बुडवणार ही पोर तुम्हाला. कोण इतक्या काळ्या पोरीशी लग्न करेल?” त्र्यंबक स्वामींना एक नातेवाईक बोलत होता. हे सगळं चौथीत असलेली स्नेहलता ऐकत होती. आपला काळा रंग, आपण सुंदर नसल्यामुळे आई-बाबांना त्रास होतो. आपलं लग्न होणार नाही, झालंच तर भरपूर हुंडा गोळा करावा लागणार. स्नेहलताच्या इवल्याशा मनावर लोकांच्या टोमण्यांचे क्रूर ओरखडे उठले. तिने मरून जायचे ठरवले. ती धाय मोकलून रडू लागली. पण, तिच्या बाबांनी तिला जवळ घेतले. ते म्हणाले, “बाळ, रंगरूप आपल्या हातात नसते, पण आपले कर्तृत्व आपल्या हातात आहे. तू इतकी मोठी होशील की, लोकांना तुझ्या रंगरूपाबद्दल नाही, तर तुझ्या कर्तृत्वाबद्दल बोलताना गर्व वाटेल.” त्या दिवसापासून स्नेहलताने ठरवले की, आपण आयुष्यात काहीतरी करायचे.
प्रत्येक वर्षी ती शाळेत प्रथम क्रमांक मिळवायची. पुढे महाविद्यालयीन जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती म्हणून काम करू लागली. अभाविपच्या ‘प्रतिभा साहित्यसंगम’मध्ये तिच्या साहित्यिक प्रवृत्तीला धुमारे फुटू लागले. तिच्या स्वप्नांना ध्येयाचे पंख लागले. तिने डॉक्टर व्हायचे ठरविले. पुढे बारावीनंतर मेडिकलमध्येही तिचा प्रवेश निश्चित झाला, पण इतके पैसे आणायचे कुठून? बाबा तर ती चौथीत असताना शिक्षकी पेशातून निवृत्त झालेले. घर, आर्थिक परिस्थिती यथातथाच. शेवटी प्रथम क्रमांकाने मेडिकलमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणार्या स्नेहलतेला नाईलाजाने डीएडला प्रवेश घ्यावा लागला. डीएडच्या दुसऱ्या वर्षी तेलंगणजवळच्या सांबय्या स्वामी या गुणवान तरुणाशी तिचा विवाह झाला. नववी शिकलेला आणि रिक्षा चालवणारा सांबय्या हा रा. स्व. संघाचा प्रचारक राहिलेला तरुण. त्याचे जीवन साधे, पण विचार उच्च होते.
पुढे स्नेहलता परीक्षेत पास झाली, मात्र मुलाखाती सोळा गुणांनी तिची पोस्ट गेली. त्या रात्री तीन वाजेपर्यंत स्नेहलता रडत होती. दुसर्या दिवशी पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. प्रज्ञाबोधिनीच्या सचिन हिसवणकरांनी तिच्याशी संपर्क साधला आणि ते म्हणाले, “जिद्द सोडू नकोस. प्रयत्न का सोडतेस! कदाचित यश तुझ्या जवळ आले असेल.” त्यांच्या शब्दाखातर दुसर्या दिवशी स्नेहलताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पासही झाली. स्नेहलता मग पुन्हा नांदेडला परतली. तिथे खाजगी शिकवणी घेऊ लागली. तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. त्यावेळीही स्वामी दाम्पत्याकडे पाचशे रुपयेच होते, पण पुण्याच्या प्रवीण यांनी मदत केली. ज्ञानप्रबोधीनीचे सविता कुलकर्णी, विवेक कुलकर्णी तसेच आयएएस ऑफिसर अजित जोयी या सर्वांनी स्नेहलताच्या मुलाखातीची तयारी करून घेतली. साधी कॉटनची साडी नेसून, स्नेहलता इंटरव्ह्यूला गेली. मुलाखातकारांनी विचारले तुम्ही कविता करता. एखादी कविता वाचा. इतके प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी माघार घ्यावी लागणाऱ्या स्नेहलताच्या मनातून कविता उमटली,
गौतमालाही सोसाव्या लागल्या झळा
बुद्ध होण्यासाठी...
माझाही पेटलाय दिवा आता
कटिबद्ध राहण्यासाठी...
ध्येय गाठण्यासाठी काळीज
दगडाचं करावं लागतं...
माझी धडपड कदाचित
तुम्हाला कळणार नाही...
पण मी हरणार नाही!
मी ढळणार नाही!
माझी जागा मी सोडणार नाही!
पुढची २१ मिनिटे स्नेहलतेची मुलाखत झाली. काही दिवसांत निकाल आला. स्नेहलता मुलाखतीत उत्तीर्ण झाली होती. ती आता नायब तहसीलदार नांदेड राजपत्रित अधिकारी झाली होती.
आपल्या यशाबद्दल बोलताना स्नेहलता सांगते, “मी अभाविपची कार्यकर्ती आणि आता ‘सामाजिक समरसता मंच’ची कार्यकर्ती आहे, तर पती रा. स्व. संघाचे प्रचारक राहिलेले. त्यामुळे जीवनाला एक ध्येयशील आशावाद लाभला आहे. मला इतकेच कळते, की माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि तिला जर माझ्याकडून काही मदत हवी असेल, तर ती मला करायलाच हवी. स्नेहलतेचे मनोगत आणि माणूस म्हणून स्नेहलतेच्या जीवनाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.