मुंबई : बेस्टमध्ये प्रथमच कंत्राटीपद्धतीने ५०० कामगारांना सेवेत रुजू करण्यात येणार आहेत. यापूर्वी खासगी बसगाड्या, विद्युत विभागात कंत्राटी कामगार नेमले आहेत.
बेस्ट उपक्रम हा पालिकेचा अंगिकृत उपक्रम असून गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा दिवसेंदिवस तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येते आहे. गेल्या काही वर्षापासून विद्युत विभाग परिवहन विभागाचा आर्थिक भार सोसत आहे. बेस्टला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने अनेक उपक्रम राबवले. मात्र प्रत्येकवेळी अपयशच आले आहे. कामगारांचे महिन्याचे वेतन देण्यासाठीही बेस्टकडे पैसे नाहीत. त्यामुळे विविध ठिकाणी उत्खनन करणे, तारखंड टाकण्याची कामे करणे आणि अन्य संबिधित तांत्रिक कामे पार पाडणे यासाठी अकुशल कामगारांची निवड केली जाणार आहे. यापूर्वी बेस्ट मध्ये नवघाणी या पदावरील कर्मचारी ही कामे करतात. मात्र आता या पदावर कर्मचाऱ्यांची भरती न करता कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. सुमारे ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुपर सर्व्हिस पॉईंट व डी एम एंटरप्राइज या दोन कंत्राटदारांना कामे देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी बेस्ट समितीत मंजूर झाला.
सध्या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात याच कामांसाठी नवघाणी कर्मचारी नियुक्त असून त्यांचे वेतन महिन्याला साधारण १९ हजार रुपये आहे. व इतर दिवसाला साधारण १ हजार १४७ रुपये खर्च प्रति कामगार बेस्टला खर्च येतो. तसेच हंगामी कामगारास सध्या बेस्ट उपक्रमाकडून दिवसाला ७०४ रुपये आणि बस पास मिळून ७७४ रुपये खर्च येतो. शिवाय सुरक्षेची साधने व अवजारे देखील या हंगामी कामगारांस पुरवावी लागतात. या १० टक्य्यांचा विचार करता बेस्टला ८५१ रुपये खर्च येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्यासाठी कंत्राटीपद्धतीने कामगारांची निवड केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, कामगार संघटनांनी या निवडीला तीव्र विरोध केला आहे.