नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना आफ्रिकेकडे घेऊन जाणाऱ्या विमानाचा अचानक संपर्क तुटल्यामुळे केंद्र सरकारमध्ये आज एकच खळबळ उडाली होती. परंतु थोड्याच वेळात विमानाशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित झाला असून स्वराज या पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती स्वराज यांचे पती गव्हर्नर स्वराज यांनी दिली आहे.
भारताहून आफ्रिकेकडे जाताना मॉरिशस येथे स्वराज यांच्या विमानाचा एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) बरोबर असलेला संपर्क तुटला. यावेळी विमानाशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु वारंवारपणे संपर्क तुटत होता. यानंतर तब्बल १४ मिनिटे विमानाचा संपर्क तुटल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. परंतु मॉरिशस एटीसीने पुन्हा एकदा प्रयत्न करत विमानाशी संपर्क केला.
द. आफ्रिकेमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून स्वराज या आज दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. यासाठी भारतीय वायुदलाचे आयएफसी३१ या विमानामधून त्या द.आफ्रिकेला रवाना झाल्या आहेत. स्वराज यांचा हा दौरा एकूण पाच दिवसांचा असून या दरम्यान त्या द.आफ्रिकेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.