नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडियो व्हायरल झाला आणि अचानकच पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. यावर काँग्रेसतर्फे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी "हा व्हिडियो आता व्हायरल करणे म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळणे आहे." असे मत व्यक्त केले आहे. काल हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता हा व्हिडियो व्हायरल केला. अशा प्रकारे जवानांना पुढे करुन तुम्ही जनतेची मते मिळवू शकत नाही." असे देखील ते यावेळी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधकांनी या कारवाईचे पुरावे मागितले होते. तसेच केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आता हा व्हिडियो आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या व्हिडियोची काहीच आवश्यकता नव्हती, देशासाठी सेनेने उद्गारलेला प्रत्येक शब्द भगवत गीतेइतका पवित्र आहे, असेही सुरजेवाला यावेळी म्हणाले.
यावर भारतीय जनतापक्षातर्फे सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील उत्तर दिले आहे. "तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली, तर त्याचा व्हिडियो का प्रसिद्ध केला नाहीत? आणि तुम्ही केला नाहीत म्हणून आम्ही पण करु नये असे का? असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे. तसेच "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" अशी परिस्थिती आता काँग्रेसची झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.