वटपौर्णिमेला प्रत्येक महिलेने वडाचे एक रोप लावावे
आंबे खातांना विशेष काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
जळगाव :
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहित महिला पूर्वापार चालत आलेले वटपौर्णिमा व्रत करतात. या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी हिरव्या बांगड्या, गहू -तांदूळ, तसेच आदी पूजेचे साहित्य घेवून वडाची पूजा करतात.
या पूजेत प्रामुख्याने आंब्याचे महत्त्व असल्याने उपवास सोडतांना महिला आंब्याच्या रसाला प्राधान्य देतात. मात्र, शास्त्रानुसार पावसाळ्यात आंबे खातांना योग्य काळजी न घेतल्यास बर्याच महिलांना त्रास झाल्याचेही आढळते. या संदर्भात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी ‘तरूण भारत’ शी बोलतांना माहिती दिली.
आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळ्यात साधारण आंब्यात किड पडते. काही वेळेस ते साध्या डोळ्यांना सहज दिसत नाही. पण बर्याच घरात गृहिणी आंब्याचा रस बनविणे पसंत करतात. मात्र आंबा कापून घेतल्यास खाण्यास योग्य आहे की नाही याची खात्री होते.
त्यामुळे आंबा कापून खाणे योग्य आहे. त्यामुळे महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी खबरदारी घ्यावी, असेही डॉ.गायकवाड यांनी सांगितले.
वृक्षाला दोरे बांधून नव्हे, तर रोपे लावून साजरी करा वटपौर्णिमा
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची महिला मनोभावे पूजा करतात. मात्र, याऐवजी प्रत्येक व्रत करणार्या महिलेने एक वडाचे रोप लावल्यास वृक्षांची संख्या वाढेल आणि खर्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी होईल, असे आवाहन डॉ. रितेश पाटील यांनी केले.
बहुपयोगी वडाचे झाड
या वृक्षात देवांचा वास असतो, अशी लोकांची धारणा आहे. यामुळे या झाडावर सहसा कोणी कुर्हाड चालवत नाही. बदलते हवामान आणि वाढते तापमान यांच्याशी संपर्क करून ते तग धरु शकतात. ही झाडे पानझडी नसून सदाहरीत वर्षभर शितल छाया देतात. त्यामुळे पशू, पक्षी, मानव या वृक्षांचा आश्रय घेतात. औषधी गुणाधर्मासोबत रात्रंदिवस प्राणवायूचा पुरवठा करते. ही वृक्षे महारुक्षांच्यात गणली जातात. याच्या मुळा जमिनीत खोलवर रुजली असल्याने मोठ्या वादळांमध्ये सहसा उन्मळून पडत नाहीत. गुरे याचा अन्न म्हणून वापर करत नसल्याने या वृक्षांचे संरक्षण होते. यासाठी वडाचे रोप अवश्य लावले पाहिजे.