जम्मू काश्मीर : सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आज पासून सुरुवात झाली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांचा पहिला समूह आज रवाना झाला आहे. जम्मू काश्मीरच्या ऊधमपुर येथे या समूहाचे स्वागत करण्यात आले. गेल्यावर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावेळी सुरक्षा व्यवस्थेसंबंधी विशेष नियम पाळण्यात आले आहेत.
या यात्रेसाठी निघालेल्या पहिल्या समूहात एकूण १९०४ भाविक सहभागी झाले आहेत. यामध्ये १५५४ पुरुष, ३३० महिला आणि २० लहान मुले सहभागी झाले आहेत. यात्रेत ३६ बस आणि २५ छोटी वाहने सहभागी झाली आहेत.
दक्षिण काश्मीर येथे ३८८० मीटर उंचावर स्थित शंकराच्या अमरनाथ मंदिराच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेत सहभागी होतात. आता पर्यंत या यात्रेसाठी एकूम २ लाख नागरिकांनी आपले नाव नोंदविले आहे.
यावेळी सुरक्षेचा कठोर बंदोबस्त पाळण्यात आला आहे. यामध्ये सर्व वाहनांवर रेडियो फ्रिक्वेंसी टॅग लावण्यात येणार आहे. यामुळे सर्व वाहने सुरक्षा रक्षकांच्या संपर्कात राहतील.
गेल्यावर्षी भारतातील प्रसिद्ध आणि पवित्र अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये ६ भाविकांचा मृत्यु झाला होता, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा असे हल्ले झाल्याने एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.