सिंधुदुर्ग : सामाजिक उत्कर्षासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं विविध क्षेत्रातील कार्य आजही आदर्शवत आहे. कृषि विकासासाठी राधानगरी धरण, सहकार व कृषि उत्पन्नाच्या विक्रीसाठी व्यापारी पेठांची स्थापना, बहुजन समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी वसतिगृह, मागासवर्गियांना आरक्षण, अस्पृश्यता निवारण आदी क्षेत्रात राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची प्रेरणाही आजच्या तरुण-तरुणींनी घेणे आवश्यक आहे. याच बरोबर अशा थोर समाज सुधारकांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय प्रस्थापनेचा संकल्पही करायला हवा असे मत प्रमुख वक्ते नवनाथ जाधव यांनी येथे व्यक्त केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,सिंधुदुर्ग कार्यालय आयोजित येथील सामाजिक न्याय भवनात राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ समारंभात जाधव प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर हे होते. यावेळी सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, पोलीस निरिक्षक सुनिल घासे, महामंडळाचे समन्वयक नंदकिशोर साळसकर, सामाजिक कार्यकर्ते महेश परुळेकर, महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या म्हसकर, मोरजे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
अस्पृश्यता निवारण, वेदोक्त प्रकरण, आरक्षण या संदर्भात विविध घटनांची सदोहारण स्पष्टीकरण करीत जाधव म्हणाले की राजर्षि शाहू रयतेच्या प्रश्नांचा अभ्यास करुन आदेश किंवा निर्णय जाहीर करीत असत, त्यामुळे त्यांनी रयतेचा राजा ही ख्याती मिळविली. केवळ लोकप्रियतेसाठी नाही तर रयतेच्या खऱ्या गरजा कोणत्या याची त्यांना तीव्र जाणिव होती.