उद्धव ठाकरे यांची सरकार आणि परिवहन मंत्र्यांकडे मागणी
मुंबई : अचानकपणे संप पुकारल्याच्या कारणावरून राज्य सरकारकडून निलंबित करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने कामावर घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर निलंबित कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीमध्ये कुटुंबियांशी झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांनी सरकारला याविषयी आवाहन केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ८-९ जून ला पुकारलेल्या संपामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला होता, हे जरी खरे असले तरी आज सर्वांना आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप वाटत आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीसंबंधी थोडी उदार भूमिका घेऊन त्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी या संबंधी चर्चा करून यावर तोडगा काढू, असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
गेल्या ८-९ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या अपूर्ण मागण्यांसाठी अचानकपणे बेमुदत संप पुकारला होता. सरकारला याविषयी कसलीही पूर्ण कल्पना न देता हा संप पुकारल्यामुळे सरकारबरोबरच सामान्य नागरिकांना देखील मोठा त्रास झाला होता. कर्मचाऱ्यांच्या या वर्तनामुळे सरकारने तब्बल १०१० कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांचे निलंबन केले होते.