सौदी अरेबियात राहणार्या महिलांच्या दृष्टीने २४ जून हा दिवस खर्या अर्थाने खास ठरला आहे. अनेक नियमांच्या रुढी, परंपरा, राग, द्वेषाच्या बंधनात अडकलेल्या महिलांना २४ जून या दिवसापासून गाडी चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. अजून अनेक महत्त्वाचे बदल या देशात घडायचे आहेत, पण हे स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल समजले जात आहे.
गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी स्त्रियांवर वाहन चालविण्यासाठी घालण्यात आलेली बंदी उठवत असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयाचे जगभरात कौतुक होत असले तरी सौदीतील कट्टरपंथीयांनी मात्र राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता, पण या विरोधाला भीक न घालता राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
सौदी जगातील श्रीमंत देश असला तरी अनेक बाबतीत येथे स्त्रियांवर कडक बंधने घालण्यात आली होती. घरात गाडी असून अनेक महिलांना ती चालविण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी महिलांना घरांतील पुरुषांवर किंवा टॅक्सीचालकांवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता मात्र त्या स्वत: वाहन चालवू शकणार आहेत. वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन वाहतूक परवाना असलेल्या महिलांना वाहने चालवता येणार आहेत. महिलांच्या दृष्टीने हा नक्कीच ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे अनेक महिलांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद साजरा केला आहे. सौदीमधील महिलांचा बंदीवास संपविण्यासाठी मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सौदीतील मूलतत्त्ववाद्यांना हा बदल नकोसा आहे, पण मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे देशाचा कारभारच एकहाती असल्याने मूलतत्त्ववाद्यांच्या नाड्या आवळल्या गेल्या आहेत. सौदीच्या अर्थव्यवस्थेत वैविध्यता आणण्यासाठी त्यांनी ‘व्हिजन २०३०’ ची संकल्पना मांडली आहे. या व्हिजनमध्ये महिला व त्यांच्या हक्कांचा प्राधान्याने विचार केला जात आहे. गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी मागे वळून पाहिल्यास आपल्याला याचा अंदाज येऊ शकतो.
वाहन चालविण्याची परवानगी मिळावी यासाठी सौदीमध्ये गेल्या अडीच दशकांपासून प्रदीर्घ लढा सुरू होता. अरब स्प्रिंगनंतर सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापर करून जागरूक महिलांनी जागतिक समुदायाकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सौदीमध्ये नव्वदच्या दशकात वाहन परवान्यासाठी पहिल्यांदा ठिणगी पडली होती. त्यावेळी ४७ महिलांनी वाहन परवाना बंदीच्या विरोधात राजधानी रियाधमध्ये उग्र निदर्शने केली होती व वाहन चालविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महिलांना अटक करण्यात आली व काहींना नोकरीवर पाणी सोडावे लागले. या घटनेनंतर सन २००८ पर्यंत वाहन परवान्याची मोहीम मृतावस्थेतच गेली होती. अखेर सन २०११ नंतर खर्या अर्थाने सौदीमध्ये मोहीम राबविण्यात आली. अखेर या मोहिमेला मूर्त स्वरूप आले आहे.
आता सौदीने आखलेल्या ‘व्हिजन २०३०’ नुसार महिलांचे अर्थव्यवस्थेमधील स्थान ४२ टक्क्यांपर्यंत नेण्याचे अभिप्रेत आहे. वाहन चालविण्याच्या परवानगीमुळे ते प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेमध्ये वैविध्यता आणण्यासाठी होणार आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ०.४ टक्के वृद्धीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विदेशी गुंतवणुकीमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चारचाकी वाहननिर्मिती करणार्या कंपन्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
तन्मय टिल्लू