गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडल्या, त्यावरुन तेथील अस्वस्थता लपून राहिलेली नाहीच. रमझानच्या काळात शस्त्रसंधीचा दहशतवादी, फुटीरतावाद्यांनी घेतलेला गैरफायदा, जवान औरंगजेबची निर्घृण हत्या, पत्रकार बुखारींवरील हल्ला या सगळ्या घटनांचे मूळ कित्येक वर्षं चर्चिल्या गेलेल्या काश्मीर समस्येतच आहे. काश्मीरमधील समस्यांवर नेहमीच चर्चा रंगतात, पण या समस्येवरील उपाययोजनांचा म्हणावा तितका गांभीर्याने विचार केला जात नाही. तेव्हा, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या माध्यमातून काश्मीरमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सूचविल्या गेलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा या लेखात केलेला उहापोह...
काश्मीरला ‘भारताचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. काश्मीर हे भारताची अस्मिता आणि भारताचा गौरव. अशा या निसर्गरम्य काश्मीरची भुलवणारी सुंदरता, काश्मीरचे थंडगार हवामान आणि उत्तुंग हिमालयाच्या भव्यतेची वर्णनं आपण नेहमीच वाचत, ऐकत आणि पाहात असतो. पण, त्याचबरोबरीने भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजतागायत आपण काश्मीरच्या मुद्द्यावर दहशतवाद, भ्रष्टाचार, रक्तपात, अपहरण, या व अशा बऱ्याच घटनांचा कायम उहापोह करत आलो आहोत. पण, मुळात काश्मीर समस्या ही भारताच्या पाचवीलाच पुजली आहे, असा बहुतेक भारतीयांचा समज आहे. मात्र, किती सरकारे आली आणि गेली, पण या समस्येवर सामंजस्याच्या मार्गाने अद्यापही तोडगा निघालेला नाही. विविध पक्षांची शिष्टमंडळे काश्मिरात आली व त्यांनीही आपापल्यापरीने काश्मीरच्या सद्यस्थितीवर, उपाययोजनांवर अहवाल सादर केले. पण, तरीही खोऱ्यातील परिस्थिती ‘जैसे थे’का आहे? की, ही चिघळणारी परिस्थिती अशीच ठेवण्यामागे काही गुप्त हेतू आहेत का? असे अनेकविध प्रश्न उभे राहतात.
मुळात काश्मीर प्रश्नाची सुरुवात जरी १९५० च्या दशकात झाली असली तरी, आजघडीला काश्मीरमधील समस्येचे मूळ खऱ्या अर्थाने आपल्याला १९७१ पासून पाहावयास मिळते. १९७१ च्या युद्धात भारताकडून पराजय पत्करावा लागल्यानंतर पाकवर नामुष्की ओढवली व पाकिस्तानने ‘थाऊंजड्स कट’हे धोरण स्वीकारले. या धोरणानुसार पाकिस्तानने दहशतवाद्यांचा भारताविरोधात हत्यार म्हणून वापर करावयास सुरुवात केली. भारतात विविध समस्या निर्माण करुन सीमेवर तसेच सीमेअंतर्गत अशांतता पसरवण्याचे काम पाकिस्तान वेळोवेळी करत राहिला. सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन, तर ‘सिमी, ‘इंडियन मुजाहिद्दीन’ यांसारख्या दहशतवादी संस्थांच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवादी कारवायांचे मनसुबे राबविले गेले. खरं तर दहशतवाद्यांनी फुटीरतावाद्यांचा मुखवटा चढवून काश्मीरमध्ये कायम संप, हरताळ, बंद पुकारून काश्मीरची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यावर भर दिला. त्यामुळे काश्मिरी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. ते म्हणतात ना, रिकामे हात आणि रिकामे डोके हे नेहमीच घातक ठरते. त्यानुसार काश्मीरमधील बेरोजगारीने हिंसक वळण धारण केले. या फुटीरतावाद्यांना पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ने कोट्यवधींचा अर्थपुरवठा केला. त्यामुळे या बेरोजगारांच्या हाती गैरमार्गाने का होईना, हाती थोडा फार पैसा खेळू लागला. त्यामुळे एकीकडे बेरोजगारी वाढावी म्हणून संप घडवायचे आणि बेरोजगारी वाढली की, त्यांना दहशतवादी कृत्यासाठी वित्तपुरवठा करायचा, असे कुटील धोरण पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरण्यास सुरुवात केली.
काश्मीरमधील प्रत्येक नागरिक हा दहशतवादी आहे, असा काही भारतीयांचा मोठा समज असल्याचे काश्मिरींना वाटते. त्यामुळे आम्ही देखील भारतीय आहोत, राष्ट्रवादी विचारसरणीचे आहोत, हे सांगताना काश्मिरींचा ऊर अभिमानाने भरून येतो. नुकतेच शहीद झालेले औरंगजेब हे पुँछ-राजौरी सेक्टरमधील सलानी गावचे रहिवासी आणि त्यांनी याच मायभूमीसाठी बलिदान दिले. तसेच मकबुल शेरवानी या काश्मिरी युवकाच्या शौर्यगाथा आपल्याला त्याच्या प्रति नमन करावयास भाग पाडतात. हा युवक मुळचा बारामुल्लाचा. १९४७ मध्ये तो फिरस्तीसाठी म्हणून घराबाहेर पडला व त्याला काही जवानांनी श्रीनगरकडे जाण्याचा मार्ग विचारला. मात्र, ते जवान हे पाकिस्तानचे सैनिक होते. ही गोष्ट लक्षात येताच, शेरवानीने त्यांना चुकीचा मार्ग दाखविला. त्यामुळे पाकिस्तानी सैनिक तीन दिवस जंगलात भटकत होते. यादरम्यान भारतीय सैन्याने पाक सैन्याचा खातमा केला. त्याची शिक्षा म्हणून पाकिस्तानने मकबुल शेरवानीस जिवंतपणे खिळ्यांनी झाडाला ठोकून मारले व त्या अत्याचारात त्याचा मृत्यू झाला. याचप्रमाणे भारतासाठी ‘रायझिंग काश्मीर’या वृत्तपत्राचे मुख्य संपादक सुजात बुखारी, सैय्यद मीरकशाह, हाजी जाफर खान, ले. उमर फैय्याज, बिलाल अहमद डार असे अगणित काश्मिरी युवक शहीद झाले आहेत.
या सर्व घटनांचा मागोवा घेण्याचा उद्देश इतकाच की, नेमक्या काश्मीरच्या परिस्थितीची जाणीव आपल्याला व्हावी. केवळ वृत्तपत्रातील बातम्या किंवा दुरचित्रवाणी संचावरील संभाषणांवरुन आपण काश्मीर समजण्याचा आणि काश्मीरबद्दल मत बनविण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, काश्मीरमधील विविध क्षेत्रातील सुमारे ३०० पेक्षा जास्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सत्य ‘राष्ट्रीय स्वाभिमान यात्रा’ या चळवळीतून मांडण्यात आले. काश्मिरी जनता स्पष्टपणे म्हणते की, “होय, भारत आम्हाला प्रिय आहे. आमचे भविष्य भारतात आहे. आम्हाला शांतता हवी आहे. आम्हाला तुम्ही बंधुभाव द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे.” काश्मीर व काश्मिरी हे आमचेच आहे, हा भाव आपणही मनी बाळगला, तर आपली एकजुट दिसेल व पाकच्या नापाक इराद्यांना वेसण घालता येईल. रमजानच्या कालावधीत भारतीय सैन्याने जाहीर केलेली शस्त्रसंधी पाकी दहशतवाद्यांच्या पथ्यावरच पडली. या शस्त्रसंधीचा फायदा घेत एका ठिकाणी त्यांचा तासभरापेक्षा जास्त वावर होता, असेही काश्मीरवासीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारत सरकारने विविध विकास उपक्रमांबरोबरच काश्मीरमधील दहशतवादविरोधी धोरण कायम ठेवावे आणि खोऱ्यात शांतता प्रस्थापित करावी, अशी काश्मीरवासीयांची आशा आहे.
काश्मीर समस्या आणि तिचे उगमस्थान आपल्याला समजले. मात्र, त्यावर उपाय काय, याचा आपण आता विचार करावयास हवा. त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काश्मिरी नागरिकांशी थेट संवाद साधून राष्ट्रीय स्वाभिमानी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत व त्याचे सादरीकरण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या समोर केले आहे. त्याच उपयांवर आपण सगळ्यांनी मिळून कार्य करणे हेच नंदवनाच्या शांततेचे गमक असेल आणि पुन्हा थंड काश्मीर रक्तरंजित न होता, केशराच्या सुगंधात न्हाहून निघेल, तोच आपल्यासारख्या भारतीयांसाठी ‘कश्मिरियत’चा दिन ठरेल यात शंका नाही.
नंदनवनाच्या शांततेसाठी सूचविलेले उपाय
काश्मिरींचे संरक्षण, प्रोत्साहन, सन्मान आणि सशक्तीकरण : या अंतर्गत पाकपासून काश्मिरींचे संरक्षण करणे, त्यांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे, त्यांच्या जीवनमानास प्रोत्साहन मिळेल अशाप्रकारची धोरणे सरकारने राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. सन्मानजनक जीवन आणि त्या जीवनाचे सशक्तीकरण यावर भर असावा.
काश्मिरी जनतेच्या मनात काश्मीर हे भारतभूमीचे अंग जरी असले तरी काश्मिरींची मने ही दुभंगलेली आहेत. दहशतवादी वातावरणाच्या छायेत काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारी योजनांचा लाभ काश्मीरमध्ये समाजाच्या शेवटच्या स्थरापर्यंत पोहोचत नाही व त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने त्या योजनांची अंमलबजवणी करण्यात मोठी समस्या निर्माण होते. सामान्य व्यक्ती सरकारला न्यायपूर्ण, संवेदनशील मानेल असे वातावरण आणि व्यवस्था ही आजमितीस काश्मीरची मुख्य गरज आहे. केवळ काही विशिष्ट कुटुंबीयांचा पगडा हा काश्मिरी राजकारणावर राहिला आहे. काश्मीरमधील महाविद्यालयांची स्थितीही दयनीय असून केंद्रशासन पुरस्कृत विविध योजना या कार्यन्वित असूनही तेथील विद्यार्थी हे सदर योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे. त्युमळे ‘कश्मीर भी हमारा, कश्मिरी भी हमारे’ असे आपण भारतीयांनी एकदिलाने ठरवून त्यावर कार्य करण्याची गरज आहे.
अभिमन्यू कोहाड
राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या राष्ट्रीय सुरक्षा
आणि परराष्ट्र संबंधचे राष्ट्रीय संयोजक तथा कार्यक्रम समन्वयक
- प्रवर देशपांडे