भारतीय मुस्लीम जगात सर्वोत्तम : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018
Total Views |
 
 
 
नवी दिल्ली : भारतीय मुसलमान जगातील सर्वोत्तम मुसलमान आहेत, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. ते मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या वतीने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ईद मिलन’ समारंभात बोलत होते. राजधानीत संसद सभागृहाच्या अनेक्सीत हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
 
मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार, मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल, गिरीश जुयाल, अबू बकर नकवी, डॉ. शहीद अख्तर आणि विराग पाचपोर तसेच अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ मोहम्मद शब्बीर, केंद्रीय हज कमिटीचे माजी अध्यक्ष तन्वीर अहमद, भाजपा अल्पसंख्य मोर्चाचे अनेक नेते, मंचाचे प्रदेश स्तरावरचे संयोजक आणि प्रतिष्ठित मुस्लीम, ख्रिश्चन आणि अन्य धर्मीय लोक या कार्यक्रमात उपस्थित होते.
 
यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले कि, भारतातील मुस्लीम हे मजबुरी म्हणून भारतात राहत नसून स्वेच्छेने त्यांनी भारतात राहणे पसंत केले आहे. अन्यथा ज्यावेळी देशाचे विभाजन झाले तेव्हाच ते पाकिस्तानात निघून गेले असते. पण ते गेले नाहीत. भारतीय मुसलमान हे जगातील मुसलमानांच्या तुलनेत सर्वोत्तम आहेत असे माझे मत आहे, असेही म्हणाले त्यावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने आणि ‘भारत माता कि जय’ च्या घोषणांनी दणाणून गेले होते. पुढे सिंह म्हणाले कि, माझ्या या म्हणण्याला आधार आहे. आज जगात २१ मुस्लीम देश आहेत पण इस्लामचे जे ७२ पंथ (फिरके) आहेत ते फक्त भारत या एकमात्र देशात शांततेने, गुण्या-गोविंदाने राहत आहेत. हीच भारताची शक्ती आहे, भारतीय संस्कृतीची ही विशेषता आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंच श्री इंद्रेश कुमार यांच्या मार्गदर्शनात समाजाला जोडण्याचे जे महत्वपूर्ण काम करीत आहे त्याबद्दल मंचाचे आणि इंद्रेश कुमारजींचे कौतुक गृहमंत्र्यांनी केले. आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाप्रती आपले प्रथम कर्तव्य आहे याची जाणीव देखील त्यांनी यावेळी करून दिली.
 
इंद्रेश कुमार यांनी मंचाच्या विविध सेवाकार्यासंबंधी माहिती दिली. जम्मू – काश्मीरच्या हिंसक वातावरणात मुस्लीम समाजासोबत संवाद प्रक्रिया कशी सुरु झाली त्याचा आढावा घेत ते म्हणाले कि प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण करावे आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा हीच मानवता आहे. कुराणात सुद्धा हेच सांगितले आहे. शिक्षण, आरोग्य, तलाक-पीडित महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पेन्शन योजना आणि मुस्लीम मुलांसाठी शिक्षण सहायता योजना, गरीब लोकांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून अनाज बँक सारखे प्रकल्प मुस्लीम राष्ट्रीय मंच चालवीत आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने मुस्लीम विद्यार्थ्यांसाठी शिक्षा सहायता योजना, तलाकशुदा महिलांसाठी गैरसरकारी पेन्शन योजना आणि गरीब परीवारांसाठी अनाज बँक योजना सुरु केल्या आहेत. तसेच गरीब घरातील मुस्लीम मुलींच्या विवाहप्रसंगी आर्थिक मदत करण्याची योजनाही मंचाने सुरु केले आहे. या योजनांना समाजाने आणि मशिदी, दरगाह यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले कि, सध्याच्या सरकारने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे कि भारतातील मुसलमानांचे ते ‘खरे आणि सच्चे मित्र’ आहेत. मुस्लीम राष्ट्रीय मंच आज देशातील ‘अजेंडा सेटर’ संघटना झाली आहे. ज्यावेळी या संघटनेची सुरुवात झाली तेव्हा तत्कालीन सरकार त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. समाजाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी मुस्लीम समाजाला केले.
 
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सभागृहात एकत्रित सर्व मुस्लीम बांधवांना इंद्रेश कुमार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘हसत - खेळत योग’ करावयास लावला आणि सर्व उपस्थितांनीदेखील केला. मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहंम्मद अफझाल, अबू बकर नकवी, डॉ शाहीद अख्तर, अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ प्रोफेसर मोहम्मद शब्बीर, तन्वीर अहमद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मंचाचे दिल्ली प्रांत संयोजक यासिर जिलानी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
 
@@AUTHORINFO_V1@@