राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचा दावा
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये झालेल्या 'गोध्रा हत्याकांडा'ची आठवण झाली आहे. राष्ट्रावादी कॉंग्रेसकडून सुरु करण्यात आलेल्या 'संविधान बचाव मोर्चा'च्या उद्घाटनात पवारांनी पुन्हा एकदा 'गोध्रा कांड'चा मुद्दा उपस्थित करत, संविधानावर विश्वास नसलेल्या या राज्यकर्त्यांना खाली खेचा असे आवाहन केले आहे.
भाजप आणि संघाचा सुरुवातीपासून भारतीय संविधानावर विश्वास नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य आणि वंचित घटकांसाठी संविधानाची निर्मिती केली. परंतु संघाने मात्र याला कायमविरोध केला आणि हेच बाळकडू 'भाजप'ला देखील दिले आहे. गुजरातमध्ये घे लोक सत्ते असताना, गोध्रा कांड सारखी घटना घडली. परंतु त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याऐवजी परिस्थिती आणखी जास्त भडकून अनेक निष्पाप लोकांचा यांनी बळी घेतला होता, असे वक्तव्य पवार यांनी यावेळी केले. तसेच संविधानाविषयी अनादर बाळगणाऱ्यांना खाली खेचणे हेच खरे देशातील परिवर्तन असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीकडून 'संविधान बचाव मोर्चा' सुरु करण्यात आला आहे. आपल्या देशाच्या संविधान सभेत महिलांचा सहभाग होता, मात्र आज देशाची परिस्थिती तशी नाही. या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी नवी क्रांती करावी लागेल. म्हणूनच संविधान वाचवा, देश वाचवा हा कार्यक्रम राज्यपातळीवर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक भागात केला जाईल, अशी माहिती फौजिया खान यांनी दिली.