पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली असली तरी मान्सूनमध्ये पडलेला खंड हा पुढील ५-६ दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तरी देखील राज्यात येत्या दोन दिवसांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकण प्रांतात काल पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान या सर्वांमध्ये मान्सून मात्र स्थिर राहील व त्यातील खंड देखील कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सूनमध्ये पडलेल्या खंडाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना लवकर पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु राज्यभर तुरळक प्रमाणात सुरु असलेल्या पावसाच्या बळावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. कोकणात देखील काही ठिकाणी भाताची लागवड सुरु करण्यात आली आहे.