मुंबई: मुंबईतील महापालिकेच्या तलावांचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी नौकाविहार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी मिळाली.
“मुंबईमध्ये शहर व उपनगरांमध्ये अनेक तलाव आहेत. यामध्ये गणेशोत्सव व नवरात्रोत्सवांमध्ये गणेश व देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येते. परंतु हे उत्सव झाल्यानंतर तलावांमध्ये शेवाळ व केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरते. येथील कचरा काढून त्यांचे सुशोभिकरण करण्यात यावे व माफक शुल्क आकारून त्या ठिकाणी नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून पालिकेला महसूल प्राप्त होऊन मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल,” अशी मागणी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेला दि. २८ ऑक्टोबर २०१३ रोजी सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला. यावर उत्तर देताना आयुक्तांनी मुंबई शहर-उपनगरातील पालिकेच्या अखत्यारितील विविध तलावांचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या तलावांमध्ये माफक शुल्क आकारून नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला होता. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांचा तलावांमध्ये नौकाविहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.