पुणे : अण्णा हजारेंचे राणेगणसिद्धी असो किंवा पोपटराव पवारांचे गाव हिवरेबाजार ही गावं जात आणि उतरंड विसरून पाण्यासाठी एकत्र आले म्हणून विकसित झाले. तेच सूत्र मानून महाराष्ट्रात गावोगावी पाणीच माणसामाणसातील भेद कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे मत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने 'जातीभेदमुक्त विकसित भारत’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अध्यक्ष या नात्याने उपस्थितांना संबोधित केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन एस उमराणी, विविध अध्यासनांचे प्रमुख आणि विविध विद्यापीठांचे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नितीन करमळकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठेंप्रमाणे स्पष्ट भूमिका घेऊन काम करणारे तरुण आणखी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजेत. तरच समाजशिक्षण होऊन एकसंध समाज निर्माण होईल.” “गावोगावी पाणी उपलब्धता ही समस्या आहे. त्याच आधारे जातीभेद मुक्तीचे काम होऊ शकते. भूगर्भशास्त्राचा अभ्यास करताना पाणी व विंधन विहिर विषयी काम करत असताना पाण्याच्या आधारे समसामान्यांना एक करता येते हे जाणवले, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटक प्रा. रमेश पांडव यांनी स्थानिक पातळीवर काम होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले, “आधुनिक काळात जातिभेदाचे नवनवे बुरूज उभे राहत आहेत. प्रत्येकाला स्वतःची जात विसरून पुढे जावे लागेल. काम करताना जात विसरला नाहीत तर सगळ्या जातींना बोल लावले जातील.” औरंगाबाद येथील हायटेक इंजिनिअरिंग इंस्टिट्यूटमध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत असतानाच पाणी, शेती आणि त्यानिमित्ताने समाजातील भेदांवर निर्मूलनाच्या सूत्राने प्रा. रमेश पांडव यांनी काम केले आहे.
“प्रबोधनकाळापासून जातीभेद मुक्तीचा विचार समाजात रुजावा म्हणून प्रयत्न केले. तरीही आपण जातीला अधिक घट्ट चिकटत आहोत. प्रत्येकाने जात विसरून जातमुक्तीचा विचार पुढे रुजवला पाहिजे. नाहीतर जुन्या काळाप्रमाणे जात ही व्यवस्था अधिक घट्ट बनत जाईल. त्यापासून मुक्ती मिळाली तरच समाज म्हणून एकसंध भूमिका आपण घेऊ शकू.” लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने आज आयोजित परिसंवादाच्या निमित्ताने राज्यातील इतर विद्यापीठांमध्येही अशा चिंतन परिसंवाद व्हायला हवेत असे विचार अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. सुनील भंडगे यांनी मांडले.