या गोंधळाबाबत भाजपचे खा. कपिल पाटील यांनी तातडीने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना पत्र पाठविले असून, मतदानकेंद्रांबाबतचा गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भिवंडी तालुक्यात भिवंडी तहसील कार्यालय व वज्रेश्वरी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, तालुक्यातील अनेक गावातील मतदारांना तेथे मतदान करण्यासाठी तब्बल १६ किलोमीटर जावे लागणार आहे. भिवंडी शहरापासून काल्हेर व दिवे-अंजूर गावे १५ किलोमीटरवर आहेत तर वज्रेश्वरी ३० किलोमीटरवर आहे. मात्र, काल्हेर व दिवे-अंजूर येथील मतदारांची नावे चक्क वज्रेश्वरी येथील केंद्रात आहेत. तालुक्यातील अन्य गावांमधील मतदारांचीही अशीच स्थिती आहे. वज्रेश्वरीपासून जवळ असलेल्या अनगाव येथील मतदारांची भिवंडी येथील केंद्रात नोंद केली आहे. अशा चुकीच्या पद्धतीने मतदारयादी तयार केल्यामुळे मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मतदारांना सहजपणे हक्क बजाविण्यासाठी मतदानकेंद्रात बदल करावा. तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खा. कपिल पाटील यांनी केली आहे.