नवी दिल्ली : "शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मिळकतीत २०२२ पर्यंत दुप्पट वाढ व्हावी, तसेच कच्च्या मालाची किंमत कमी होऊन शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे." अशी माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. आज पंतप्रधानांनी देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या ४ वर्षात देशात शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.
प्रकृतीच्या रागामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे सरकारतर्फे पीक विम्याचा हप्ता कमी करण्यात आला आहे, आणि विम्याचे व्याजही वाढवले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना आधी खत मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागायच्या मात्र आता त्यांना सोप्या पद्धतीने खत उपलब्ध होतं. यासोबतच आता त्यांच्यासाठी उत्तम दर्ज्याच्या नीम कोटींगचे खत उपलब्ध आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
'ऑर्गेनिक फार्मिंग' वर भर :
सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीवर भर देत आहे. भारताच्या उत्तरपू्र्वी भागाला सेंद्रीय शेतीचे 'हब' म्हणून विकसित केले जात आहे. आज देशात २२ हेक्टेयर पेक्षा अधिक जमिनीवर सेंद्रीय शेती करण्यात येते, असे देखील त्यांनी सांगितले.
निळ्या क्रांतीमुळे मत्स्यपालनाला प्रोत्साहन :
निळी क्रांती एक राष्ट्रीय योजना आहे, यामुळे मस्त्यपालनाचा विकास झाला आहे. यामध्ये मासे उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यपालनाचे आधुनिकीकरण, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे आणि मच्छिमार आणि मत्स्यकल्पाच्या शेतक-यांना सशक्तीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.