गूढ आजारामुळे नाशिकर त्रस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



नेमके निदान न झाल्याने नागरिकांमध्ये भिती

नाशिक: पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या गूढ आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. या प्रकारामुळे व रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे महापालिका व राज्य शासनाचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. प्रशासनाच्या हिवताप नियंत्रण विभागाचा चमू वडाळागावात दाखल झाला. तातडीने राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ११० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा आजार असल्याचे समोर आले आहे.

 
वडाळागाव परिसरातील रामोशीवाडा, जय मल्हार कॉलनी, बाराखोली परिसर, राजवाडा, माळी गल्ली, कोळीवाडा, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, मनपा शाळेचा परिसर या गावठाण भागात अचानकपणे नागरिकांना सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला. या भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ताप, डोकेदुखी किंवा अन्य कोणताही त्रास नसताना केवळ पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणार्‍या असह्य वेदना या गूढ आजाराने वडाळागावातील नागरिक हैराण झाले आहेत. हा परिसर नेहमीच सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चेत असतो. महिन्याभरापूर्वी विषाणूजन्य तापाच्या आजाराने नागरिक फणफणले होते. तापाचे रुग्ण वाढले होते. ताप नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पंधरवड्यापासून हातापायांचे पंजे आणि मनगट, घोटा, गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. सांधेदुखीचा गूढ आजार, अशी चर्चा येथे सुरू झाली होती.
 
 

तुंबलेली गटारे आजारपणास कारणीभूत - मनपा आरोग्य विभाग

वडाळागाव परिसरात डासांच्या उच्छादासह दूषित पाणीपुरवठा आणि तुंबलेल्या गटारांची समस्याही संसर्गजन्य साथीच्या आजारांच्या फैलावाला कारणीभूत ठरत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, भूमिगत गटार दुरुस्ती विभागानेही तत्काळ वडाळागाव परिसरात उपाययोजना करण्याची गरज आहे. माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, कोळीवाडा आदी परिसरांत दूषित पाणीपुरवठा पंधरवड्यापासून होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

 
 

येथे दिसतो समन्वयाचा अभाव

मनपाचा आरोग्य विभाग तुंबलेल्या गटारांमुळे साथीचे रोग फैलावणीचा धोका असल्याचे एका बाजूला म्हणतो आणि पाणीपुरवठा, भूमिगत गटार दुरुस्ती विभागाने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे आणि हे दोन्ही विभाग मनपाच्या अख्यत्यारित येत असून ते परस्परांवर जबाबादारी ढकलत आहे आणि कोणी काम करावे, हे दोन्ही विभाग माध्यमांना सांगत आहे. त्यामुळे या दोहोंत परस्परांत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे व त्याचा परिणाम मात्र नागरिकांना भोगावा लागत आहे.

@@AUTHORINFO_V1@@