पुढील मुख्यमंत्री सेनेचाच : उद्धव ठाकरे
मुंबई : ``गेलेली सत्ता पुन्हा मिळवत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार,” असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसनेच्या ५२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ‘एकला चालो रे’ ची भूमिका स्पष्ट केली असली तरी विद्यमान राज्य सरकारमधील सेनेच्या सहभागाबाबत त्यांनी यावेळी मौनच बाळगले.
आव्हाने देणार्यांच्या छाताडावर बसून राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखविण्याची गर्जना उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मात्र दुसरीकडे शिवसेनेने जम्मू-काश्मीरमधील राज्य सरकारमधून बाहेर पडण्याच्या भाजपच्या निर्णयाचे स्वागतही केले. यावेळी ठाकरे यांनी मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा डाव असल्याचाही आरोप केला. तसेच, बहुचर्चित नाणार प्रकल्प विदर्भात न्या, अशीही मागणी पुन्हा एकदा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी निर्माण केलेल्या ‘पगडीवादा’वरही उद्धव यांनी भाष्य केले. ``महात्मा फुले, लोकमान्य टिळक हे महाराष्ट्राचे दैवत असून दैवतांच्या पगड्यांवरून मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण तुम्ही करत आहात, पगड्यांमुळे लोक नाही तर लोकांमुळे आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे पगड्या प्रसिद्ध झाल्या आहेत, हे विसरू नका, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली. ‘राजकारणात डोके वापरा, पगडी नको,’ असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.