नवी दिल्ली : दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या धरणे आंदोलन याच्यावर संपूर्ण भारतातून टीका होत आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील केजरीवाल यांच्यावर टीका करत "केजरीवाल कामे करण्यात 'झीरो' म्हणजे शून्य आहेत मात्र धरणे आंदोलन करण्यात हीरो आहेत." अशा शब्दात टीका केली. माध्यमांनी त्यांच्याशी आज संवाद साधला असता ते बोलत होते.
"आप सरकारला कामे करायची नाहीयेत, केवळ धरणे आंदोलने करायची आहेत. आप सरकारच्या अशा वागण्यामुळे दिल्लीच्या जनतेचा विश्वासघात होत आहे. दिल्लीच्या जनतेने जो विश्वास या सरकारवर दाखवला आहे, तो विश्वास हे तोडतायेत." असे देखील नकवी यावेळी म्हणाले.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याविरोधात दिल्लीतील 'आयएएस' अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. हा संप मागे घेण्यासाठी राज्यपाल अनिल बैजल यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारपासून राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र कालच दिल्ली येथील आयएएस असोसिएशनतर्फे 'दिल्लीतील कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याने कामावरुन सुट्टी घेतलेली नाही, अनेक अधिकारी सुट्टीच्या दिवशी देखील काम करत आहेत. त्यामुळे आयएएस अधिकारी संपावर गेले असल्याची बातमी खोटी आहे, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे हे बिंग फुटले. आता हे धरणे आंदोलन कधी संपणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.