जळगावची घटना घडल्यानंतर तात्काळ तिचा गाजावाजा सुरू झाला. या सगळ्या गोष्टीचा रोख हिंदू समाजातील उच्चभ्रू व ब्राह्मण समाजाकडे असतो. पण, आजच्या जमान्यात हिंदू समाजाचे नेतृत्व किंवा अगदी धार्मिक नेतृत्वदेखील ब्राह्मणांकडे राहिले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात इतर अनेक लहानसहान जातीजमाती नेतृत्व करायला पुढे आलेल्या असून, ओबीसी मानल्या गेलेल्या जातीचा पंतप्रधान आज देशाचा सत्ताधीश आहे. ‘दलित’ मानल्या जाणार्या समाजाचा नेता राष्ट्रपती होऊन गेला आहे. अशा वेळी कालबाह्य झालेल्या मनुस्मृती वा धार्मिक ग्रंथांचे हवाले देऊन, हिंदुत्वावर हल्ले चढविले जातात. तेव्हा दुखावला जाणारा वर्गही कल्पनेतला ब्राह्मण नसून, तो इतर जातीजमातीचा हिंदू आहे.
वर्षाच्या आरंभी पुण्यात एल्गार परिषद म्हणून जो चिथावणीखोर तमाशा साजरा करण्यात आला, त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ‘बंद’चे आवाहन केले होते. नंतर जी जाळपोळ झाली, तेव्हाही त्यांनी आपलीच पाठ थोपटून घेत, संभाजी भिडे व एकबोटे अशा हिंदुत्वादी नेत्यांना अटक करण्याचा आग्रह धरला होता. त्यातून त्यांनी जो संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला, त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. अशा घटना वा त्याचे दृश्य परिणाम विचारवंत किंवा शहाण्यांसाठी भले वैचारिक असतील, पण सामान्य समाजाच्या आयुष्यात असे परिणाम भीषण असतात. त्यातून जो जातीय विद्वेष पसरवला जात असतो, त्याचे परिणाम चर्चा रंगवणार्यांना भोगावे लागत नसतात, तर समाजाच्या विविध थरांत मिळून मिसळून जगणार्या, विविध जाती-जमातीच्या सामान्य लोकांना भोगावे लागत असतात. त्या समाजात जी सौहार्दता नांदत असते, तिला असल्या आक्रस्ताळी भाषणांनी व वक्तव्यांनी चूड लावली जाते. त्याच्या झळा सुरक्षित जागी वास्तव्य केलेल्या प्रकाश आंबेडकर वा अन्य विचारवंतांपर्यंत येत नाहीत. ती झळ गाव, वस्त्या, पाडे व गल्लीबोळांत पोहोचत असते. कारण मुठभरांसाठी ती ‘वैचारिक चळवळ’ असते, पण समाजात मिसळून गेलेल्यांसाठी ती विसंवादाची सुरुवात असते. तिचे पर्यवसान म्हणून लहानसहान भांडणे उग्र स्वरूप धारण करतात. कारण, अशा वैचारिक मेळावे व परिषदांतून जे विष उगाळले जात असते, ते जखमांवरची खपली काढणारे असते. त्यातून मग विविध समाजघटक एकमेकांकडे संशयाने बघू लागतात आणि त्यांना मनातले विष ओकण्याचे निमित्त व संधी हवी असते. ती मिळते, तेव्हा मुंबईसारख्या शहरात जाळपोळ होते आणि खेड्यापाड्यांत जळगावसारख्या घटना घडतात. त्याची जबाबदारी सरकार नव्हे, तर एल्गार परिषदेवर येत असते. कारण, भडक शब्दांनी त्यांनीच सामाजिक सौहार्दाला चूड लावली असते.
मायावती वा प्रकाश आंबेडकर अशा लोकांनी ‘मनुवाद’ नावाचे थोतांड उभे करून, ही दिशाभूल केलेली आहे. आज समाजात कोण मनुस्मृतीचे अनुकरण करून जगतो? नसेल तर त्याचा नुसता गाजावाजा करून, काय निष्पन्न होऊ शकते? एक गोष्ट नक्की आहे, बळी असल्याचे कारण सहानुभूती मिळविण्यास उपयोगी असते. मात्र, अशा नाटकाने सुखवस्तू दलित कांगावा करतात आणि खरे वंचित त्याचे बळी होत असतात. इथे आपल्या सुखवस्तू वातावरणात सुरक्षित बसलेल्या प्रकाश आंबेडकर वा अन्य दलित पुढार्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत. राजकीय दबावामुळे त्यांना कायद्याचे संरक्षण अहोरात्र मिळत असते. पण, जळगावच्या त्या खेड्यासारख्या लाखो वस्त्या आहेत, तिथल्या दलित-वंचितांना स्थानिक शिरजोरांच्या मेहेरबानीवर दिवस कंठावे लागत असतात. त्याला त्यांची जात किंवा मस्तवालांची जात कारण नसते, तर त्यांचे आर्थिक व राजकीय दुबळेपण कारणीभूत असते. त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करणारा ‘जात’ हे निमित्त बघत असतो, पण वास्तवात ते दुबळेपणाचे बळी असतात. आपल्या राजकीय सबळतेचा वापर करून, प्रकाश आंबेडकर काल परवा एका वाहिनीवरच्या संपादकाला धमकी देतात आणि खेड्यापाड्यात जो तसाच बलदंड बाहुबली असतो, तो अशा धमक्या प्रत्यक्षात राबवित असतो. आंबेडकर काय म्हणाले होते? “आजचे सरकार जाऊन आमचे सरकार येऊ दे, मग तुम्हाला बघून घेऊ.” मग जळगावात त्या भटक्या-विमुक्त जातीच्या जोशी मंडळींनी काय वेगळे केले? त्यांच्या हाती बळ आहे, म्हणून त्यांनी असला प्रकार केला. उद्या त्याच दलितांच्या हाती सत्तासूत्रे आल्यावर त्यांनी त्याचा बदला घेणे यालाच प्रकाश आंबेडकर सामाजिक न्याय समजत असावेत. एल्गार परिषदेची तीच अपेक्षा होती; अन्यथा कुठलेही निमित्त घेऊन ‘जातिअंता’च्या नावाखाली असा ‘जातिवंत’ आगलावेपणा कोणी कशाला केला असता?
चार दशकापूर्वी समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाची चळवळ चालवली होती. त्याचे गुणगान ‘साधना’ नावाच्या साप्ताहिकातून आणि इतर पुरोगामी माध्यमातून खूप झाले. खरेच अशी चार दशकाची परिवर्तनाची चळवळ यशस्वी झाली होती, तर जळगावात असली हिडीस घटना घडण्याचे कोणतेही कारण नव्हते. पण ती घडली. कारण, ‘एक गाव, एक पाणवठा’ हे पुरोगामी पत्रकार माध्यमांनी व नेत्यांनी चालविलेले मार्केटिंग होते. प्रत्यक्षात महाराष्ट्रात लोकांच्याच मिळण्या-मिसळण्यातून जितके सामाजिक अभिसरण होऊ शकते, ते होत राहिले आहे. बाकी सामाजिक चळवळी व फुले- शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे मेळावे, परिषदा हा निव्वळ देखावा होता. त्याचा पसारा प्रसिद्धी माध्यमांत होता आणि जमिनीवर त्याचा मागमूस नव्हता. तो सामान्य लोकांमध्ये पोहोचणे दूरची गोष्ट झाली. ज्यांनी या चळवळीची धुरा खांद्यावर घेतली होती, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात वा कुटुंबातही कुठली सामाजिक समरसता कधी येऊ शकली नाही. त्यापेक्षा अशा लोकांनीच अधिकाधिक जातीय जाणिवा किंवा अस्मिता जोपासण्याचे काम केले. त्या अस्मिता टोकदार होण्यातून अशा घटनांना शाश्वती मिळालेली आहे. उच्चवर्णीय आणि पिछडे दलित सोडून द्या, त्यांच्यातील दुरावा कमी होऊ शकला नाहीच, पण वंचित-दलित अशा लहान दुर्बळ जातीजमातींमध्येही एकजीवता येऊ शकली नाही. त्यांच्या जाणिवा अधिक जातीय व तीव्र होत गेल्या आणि त्यांच्यातच एकमेकांना हीन लेखण्याची स्पर्धा सुरू झाली. परिवर्तनाच्या चळवळ्यांनी अधिकाधिक समाजाला भूतकाळ व इतिहासात नेऊन टाकले आहे. भुजबळ वा प्रकाश आंबेडकर त्याचे प्रतीक झाले आहेत. अशा मतलबी सुधारकांपेक्षाही आपल्याच गतीने मोठ्या संख्येने समाजातील नवी पिढी सुशिक्षित होऊन जातीच्या जंजाळातून बाहेर पडते आहे. देशाचा पंतप्रधान त्याचे उत्तम उदाहरण आहे.