पानशेत पूरग्रस्तांची अतिक्रमणे नियमित करण्यास तत्त्वत: मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2018
Total Views |



मुंबई : पानशेत पूरग्रस्तांची अतिक्रमणे नियमित करण्याला मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी तत्त्वत: मान्यता दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ३ हजार ९८८ पूरग्रस्त गाळेधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.

 

पुण्यातील पानशेत पूरग्रस्तांना दिलेले गाळे त्यांच्या मालकी हक्काचे करण्यासाठी रक्कम जमा करण्यास मुदत देण्याचा, तसेच पूरग्रस्तांनी केलेली अतिक्रमणे दंड घेऊन, नियमित करण्यास मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्त्वत: मान्यता दिली. पुण्यातील पानशेत पुरातील नुकसानग्रस्तांना देण्यात आलेले गाळे मालकी हक्काने करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांनी व इतरांनी केलेली अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात पुण्यातील भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी विनंती केली होती. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान सदर निर्णय घेण्यात आला.

 

पानशेत पूरग्रस्तांना पुण्यामध्ये ३ हजार ९८८ गाळे देण्यात आले होते. त्यातील अनेकांच्या नावावर हे गाळे झाले नव्हते. ते करण्यासाठी पूरग्रस्तांकडील पुरावे तसेच महसूल यंत्रणेकडील नोंदी तपासून, हे गाळे मालकी हक्काने देण्यासाठी शासनाने ठरविलेली रक्कम जमा करण्यास चंद्रकांतदादा पाटील यांनी मंजुरी दिली. तसेच यावेळी ३१ डिसेंबरपर्यंत पूरग्रस्तांना पैसे भरण्याची मुदत देण्यात आली आहे. पूरग्रस्तांनी त्यांना दिलेल्या जमिनी व गाळ्यांवर केलेली अतिक्रमणे, हस्तांतरितांनी केलेली व बाहेरील व्यक्तींनी केलेली अतिक्रमणे राज्य शासनाने ठरविलेल्या दंडाची रक्कम भरून नियमित करता येणार असून, यामुळे पूरग्रस्त गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच पूरग्रस्तांच्या सहकारी संस्थांनाही या जमिनी मालकी हक्काने देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

“गेल्या अनेक वर्षांपासूनची पानशेत पूरग्रस्तांची मागणी पूर्ण होणार आहे. शासनाने ठरविलेल्या धोरणानुसार दंडाची रक्कम भरून गरजेपोटी केलेली अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. यामुळे पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे,” असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@