नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खर्चात कपात करण्यासाठी बँकेच्या २३ ग्रामीण शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बँकेने शाखांच्या विलीनीकरणाचा निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी दि. १३ जून रोजी दिली. जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. बँकेची आर्थिकस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने बँकेच्या प्रशासकीय खर्चाचा ताळमेळ घेण्यास सुरुवात केली होती.
अल्प व्यवहार होत असलेल्या तोट्यातील २३ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. सदरच्या शाखा प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्च यामुळे या शाखा तोट्यात गेल्या. त्यामुळे संचालक मंडळाकडे सदरच्या बँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. संचालक मंडळाने २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. या निर्णयानुसार येत्या दि. ३० जूनपर्यंत सदरच्या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बँक शाखांमध्ये केले जाणार होते. मात्र त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय होणार असल्याने शाखांचे विलीनीकरण करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. बळीराजाच्या मागणीचा सकारात्मक पद्धतीने विचार करून प्रशासनाने जिल्हा बँकेच्या २३ शाखांच्या विलीनीकरणाचा निर्णय मागे घेतला आहे.