नाशिक : बंदिवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल, याचा विचार त्यांनीच स्वतःच्या पातळीवर करावा तसेच कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, धाडस आणि बुद्धी ही सकारात्मक दृष्ट्या उपयोगात आणावी, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.
स्पर्धेत अनेक महिला व पुरुष बंदीवानांनी सक्रीय सहभाग नोंदविला. कारागृह अधिक्षक राजकुमाी साळी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकार्यात सहभागी झालेल्यांचा आदर्श ठेवत आपल्यातील देशभक्तींचे विचार जीवनात उत्तरोत्तर वृद्धिंगत करावे. कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर, कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी पल्लवी कदम व टी. एस. निंबाळकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत कर्मचारी वर्गानेही सहभाग घेतला होता. त्यांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले. शिक्षक आकाश माळी यांनीदेखील स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. स्पर्धेचे परीक्षण केलेल्या स्वामिनी सावरकर यांनी स्पर्धकांच्या विचारांचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले. तुरुंगाधिकारी पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले तर आभार स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी मानले. सूत्रसंचालन रामचंद्र प्रतिष्ठानचे अशोक शिंदे यांनी केले.