भिवंडी : पॉवरलूम उद्योगातील जॉबवर्क ई-वे बिल रद्द करावे, अशी मागणी भाजपचे खा. कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पॉवरलूम नगरी असलेल्या भिवंडीत पॉवरलूम व्यवसायात सुमारे ९० टक्क्यांहून अधिक छोटे व्यापारी आहेत. या व्यवसायात यांपासून कापड तयार करण्याबाबत विविध प्रकारचे जॉबवर्क आहेत. या जॉब वर्कवर ई-वे बिल आकारण्यात येत आहेत. मात्र, त्यामुळे छोट्या व्यापार्यांची अडचण झाली आहे. या प्रश्नाकडे भाजपचे भिवंडी शहर उद्योग आघाडीचे संयोजक राकेश ओस्तवाल यांनी खा. कपिल पाटील यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे दौर्यात खा. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची व्यापार्यांसह भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रश्न समजावून घेतला. तसेच राज्य सरकार व्यापार्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले. व्यापार्यांच्या शिष्टमंडळात राकेश ओस्तवाल, भवरला पालरेचा, रतीलाल जी. सुमरीया, पुल्वराज डागरा, भरत पोरवाल, ललित पोरवाल, अंकित संकलेचा आदींचा समावेश होता.
छोट्या व्यापार्यांसाठी ई-वे प्रक्रिया जटिल असून, त्याचा खर्च सामान्य व्यापार्यांना परवडणारा नाही. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनामुळे व्यापार्यांना दिलासा मिळाला आहे.