महिलांविरोधातील अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी आयोगाचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाद्वारे सायबर समितीची स्थापन करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, मानहानिकारक आणि अश्लील वक्तव्ये अथवा टिपणी करण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आज दि. ८ मे रोजी समितीची पहिली बैठक पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. या समितीमध्ये महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, मुंबई पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीचा अनुभव असलेले वकील अँड. प्रशांत माळी, अँड. वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार आणि लेखिका मुक्ता चैतन्य यांचा समावेश आहे. तसेच काहू पोलीस अधिकारी आणि अन्य मान्यवरदेखील या समितीत असणार आहेत. या समितीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडणार आहेत. सोशल मीडियाद्वारे महिलांना त्रास देण्याचे, त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये आणि टिप्पणी करण्याचे प्रकार वाढत चालले असून नोकरदार महिला, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला तसेच महिला लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासंदर्भात आयोगाला सातत्याने तक्रारी आल्याने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाहीर अवमानकारक टिप्पणीचा महिलेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती असते, तेव्हा अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. म्हणून तज्ञ् व्यक्तींचा समावेश असलेली समिती आयोगाने स्थापन केली असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. तसेच यासंदर्भात समितीकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून तो राज्य सरकारला लवकरात लवकर सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.