ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने जीवनावर आणि जगण्यावर शतदा प्रेम करण्यास सांगणारा हळवा आणि मृदू स्वर हरवला अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
नभागंणामध्ये शुक्रताऱ्याचे स्थान अढळ असते. त्याप्रमाणे अरूण दाते यांचे सुगमसंगितातील स्थान ही अढळ आहे असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अरूण दातेंची गाणी ऐकून मोठं होण्याची भाग्य मिळालेली आमची पिढी त्यांच्या स्वरधारांमध्ये नेहमीच चिंब भिजली आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, स्वरगंगेच्या काठी वचन दिले तू मला, अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, असेन मी, नसेन मी तरी असेल गीत ही… सारखी अजरामर गाणी अरूण दातेंना लाखो आणि करोडो मनामध्ये कायम जिवंत ठेवतील.
भावगीतांमधील हळवेपण, शब्दांमधले अर्थ गहिरे करण्याची किमया त्यांच्या स्वरांमध्ये होती. आज दाते यांच्या निधनाने भावगीतांचे विश्व पोरके झाले आहे असे मला वाटते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना आहे असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.