देशावरील प्रेम निर्माण करण्यासाठी ११ पासून आरोग्य शिबीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2018
Total Views |

उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांचे काश्मिरातील सीमावर्ती भागात पोहोचले वैद्यकीय सेवेचे कार्य

 
 
जळगाव :
काश्मीर म्हटले की अतिरेकी कारवाया आणि पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेऊन, केवळ चर्चा न करता कृती करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर्स काश्मिरातील सीमावर्ती भागात वैद्यकीय सेवा देण्याचे अनमोल कार्य दरवर्षी पार पाडत आहेत.
 
 
काश्मिरातील सेक्टरांमध्ये वैद्यकीय सेवा
११ ते २० मे दरम्यान डॉ.धर्मेंद्र पाटील जळगाव, डॉ.अभिजित रामोळे, डॉ.नितीन शाहीर, डॉ.निकिता चंडोले, डॉ.सोहम चंडोले, डॉ.रेखा चंडोले, डॉ.विलास चंडोले, डॉ.योगेश पवार, डॉ.प्रभाकर बेडसे, डॉ.सतीश साळुंखे, डॉ.विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे, ऋषिकेश परमार (सर्व नाशिक) हे काश्मिरातील बांदीपुरा, अजस, संभल, बांदरगल, अशमुकम, नाहीदकाही, बारामुल्ला सेक्टर, द्रास, कारगिल या भागात वैद्यकीय सेवा देणार आहेत.
 
 
एक लाखांची औषधी
डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून व भारतीय सैन्य दलाच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले आहे. भारतीय सैन्यदलांची या शिबिरासाठी मान्यता मिळाली आहे. शिबिरासाठी लागणारी औषधी भारतीय सैन्यदल पुरविणार असल्याचे १३ राष्ट्रीय रायफल बटालियनचे कॅप्टन डॉ.सुमित यांनी डॉ.धर्मेंद्र पाटील यांना कळविले आहे. त्यासोबत जळगाव व नाशिक येथील डॉक्टरांचा चमू आपल्यासोबत एक लाख रुपयांची औषधी घेऊन जात आहे. डॉक्टरांच्या या समाज कार्याला ३RR, ५RR, १३RR, १४RR, २४RR या राष्ट्रीय रायफल बटालियन च्या जवानांचे सहकार्य लाभणार आहे.
२०० मुलींसाठी अनाथालय उभारणीला सुरुवात
डॉ. धर्मेंद्र पाटील हे आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष असून महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करतात. तसेच बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेद्वारे अखलपूर, जम्मू येथे नुकतेच २०० मुलींसाठीचे भव्य अनाथालय उभारण्यास सुरुवात झालेली आहे. डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत डॉ.प्रकाश बाबा आमटे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.
इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू
या संस्थेने काश्मीर खोर्‍यात इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली आहे. यासाठी १० अत्याधुनिक कार्डियाक ऍम्ब्युलन्स काश्मीर खोर्‍यात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी दगडफेकी दरम्यान पॅलेट गन इंजुरीमुळे दृष्टी गमावलेल्या ९०० रुग्णांवर या संस्थेतर्फे श्रीनगर येथे डॉ. नटराजन आणि टीम ने शस्त्रक्रिया केल्यात.
दरवर्षी गरजूंसाठी शिबीर
शिबिराचे आयोजन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेद्वारे केले गेलेले आहे. अधिक कदम हे या संस्थेचे संस्थापक आहेत. डॉ.धर्मेंद्र पाटील हे संस्थेचे समन्वयक तसेच आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या साथीला ऋषीकेश परमार, नाशिक यांच्या मदतीने ३०० अनाथ मुलींचा सांभाळ जम्मू, अनंतनाग, कुपवाडा, बिरवाह, श्रीनगर येथील अनाथालयात केला जातो. याआधीही या संस्थेद्वारे काश्मीरखोर्‍यात पुरग्रस्तस्थितीवेळी ४० डॉक्टरांच्या चमूने दीड महिना साडे तीन लाख रुग्णांना सेवेचा लाभ दिला आहे. तसेच गेल्या दशकापासून दरवर्षी काश्मीर खोर्‍यातील गरजूंसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.
@@AUTHORINFO_V1@@