मराठी नवकवींना दिशा देण्याची गरज : डॉ.जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : मराठी कविता ही आशय संपन्न असून तिने अनेक पिढ्या घडविल्या आहेत. त्यामुळे मराठी कवितेची दशा योग्य आहे. मात्र मराठीतील नवकवींना दिशा देण्याची गरज असल्याचे मत प्रसिध्द कवी व गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी आज महाराष्ट्र महोत्सवात व्यक्त केले. नवी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी ‍मार्गस्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवाच्या दुस-या दिवशी ‘मराठी कवितेची दशा व दिशा’ या विषयावर विचार मांडताना डॉ. जावडेकर आज बोलत होते.
 
 
कविता हे अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम अूसन कविता ही त्या-त्या भाषेच्या भावविश्वाचा कळस असते. मराठी भाषेला कवितेची दिर्घ परंपरा आहे. मराठी कवितांनी अनेक पिढया घडविल्या असे डॉ. जावडेकर म्हणाले. कविता ही अर्थकारण व समाजकारण आदीचे अदृयष्य कंगोरे घेऊन वाचकांपुढे येते. ही दिर्घपरंपरा मराठी कवितांनी जपली आहे. युवा कवीही सध्या मराठी भाषेत काव्यलेखन करीत आहेत. मात्र, आजच्या पिढीतील कविंच्या कविता एकसुरी होत असल्याचे चित्र आहे. या कवींनी समाजभान राखत रचना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मराठी भाषेतील अभिजात कविता, रंगमंचीय कविता, समजुतीच्या कविता, ॲटीटयूडच्या कविता आदी प्रकारांवर डॉ. जावडेकर यांनी विश्लेषण केले. कवितेत छंदाचे महत्व पटवून देताना त्यांनी प्रसिध्द कवी वसंत बापट रचित ‘मुंबईच्या मनकर्णिके नेसूनी फिके वसन गहिना…’ ही लावणी सादर केली. तसेच प्रसिध्द साहित्यिक पु.ल. देशपांडे व सुनिता देशपांडे यांनी वाचन केलेल्या कविश्रेष्ठ बा.भ.बोरकर यांच्या ‘सरीवर सरी आल्या गं’ या कवितेतील सोंदर्यस्थळे उलगडून दाखविणारी ध्वनी चित्रफीत सादर केली. डॉ. जावडेकर यांनी स्वरबध्द व संगीतबध्द केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या ‘तुज मज नाही भेद केला सहज विनोद’ या अभंगाच्या ध्वनीचित्रफित सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@