कोणत्याही कार्यक्रमाला फक्त एकच तास देऊ शकतात
नवी दिल्ली : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावरून गेल्या दोन दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रपती भावनाने आपली प्रतिक्रिया दिली असून 'राष्ट्रपती कोविंद हे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त एक तासच वेळ देता' अशी माहिती राष्ट्रपती भावनाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे सचिव अशोक मलिक यांनी याविषयी माहिती दिली असून हा राष्ट्रपतींचा 'प्रोटोकॉल' असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्टाचारात काही नवे बदल केलेले आहेत. त्यानुसार ते कोणत्याही दीक्षादान अथवा पुरस्कार वितरण सोहळ्यांना फक्त एकच तास वेळ देतात. याविषयी राष्ट्रपती भावनाने सर्व मंत्रालयांना देखील अगोदरच सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे हा त्यांच्या नित्याचा प्रोटोकॉल बनला आहे. परंतु असे असताना देखील चित्रपट पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यामध्ये निर्माण झालेला वादंग हा पूर्ण अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. तसेच पुरस्कारवर बहिष्कार टाकण्याविषयी अनेकांनी घेतलेल्या भूमिका अशोभनीय अशी होती, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
गेल्या ३ तारखेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वितरण झाले होते. यंदा देशातील एकूण १३१ कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. परंतु यातील फक्त ११ जणांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता. त्यामुळे पुरस्कार प्राप्त झालेल्यांपैकी तब्बल ६० जणांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे देशात एक नवे वादंग निर्माण झाला होता.