आपत्ती निवारणासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : रामदास खेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : "आपत्ती निवारणाचे कार्य प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी सामाजिक संस्था, परिसरातील संघटना आणि नागरिकांचा सहभाग घ्यावा,” असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सैन्य दलाच्या २१६ मध्य रेजिमेंटचे मेजर राजेश सेनवाल, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार राजश्री अहिरराव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता आर. एस. शिंदे उपस्थित होते.
 
खेडकर म्हणाले, "पावसाळ्यात धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. अशावेळी पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी व लगतच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी प्रशासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. आपत्तीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता करणे गरजेचे आहे. लाईफ जॅकेट, बोटी, फ्लड लाइट आदी साहित्याच्या उपलब्धतेकडे लक्ष द्यावे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय राखणे आणि आपत्कालीन स्थितीची माहिती देण्यासाठी विविध विभागांनी, तसेच तालुका प्रशासनाने आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत,” असे त्यांनी सांगितले.
 
मेजर सेनवाल म्हणाले, "पूरग्रस्तांसाठी प्रशासनाच्या समन्वयाने सैन्यदल मदतकार्यासाठी पूरप्रवण भागाची पाहाणी करून पूर्वतयारी करेल. त्यासाठी आवश्यक कक्ष लष्कराच्या देवळाली छावणी येथे सुरू करण्यात येत आहे. याप्रसंगी खेडकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तपशीलवार सादरीकरण केले. पावसाळ्यामध्ये पूरस्थिती, वीज पडून होणार्‍या दुर्घटना, दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रामुख्याने जास्त पाऊस होणारा इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाग, दिंडोरी, कळवण पेठ आदी भागांतील क्षेत्राची माहिती दिली.
 
बैठकीस सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, आरोग्य, जलसंपदा महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, अग्निशमन, बीएसएनएल, सेनादल, नागरी संरक्षण दलासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@