भारतीय लष्कराच्या कारवाईला मोठे यश
भारतीय डीजीएमओजवळ पाकिस्तानची कबुली
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर यापुढे कसल्याही प्रकारचा गोळीबार केला जाणार नाही. तसेच २००३ मधील युद्धबंदी सीमेवर लागू करण्यास आम्ही तयार असल्याची कबुली पाकिस्तान सैन्येनी दिली आहे' अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. थोड्याच वेळापूर्वी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन अर्थात डीजीएमओने भारतीय डीजीएमओंशी हॉटलाईन मशीनद्वारे संपर्क साधला असून यामध्ये २००३ ची युद्धबंदी लागू करण्याविषयी दोन्ही डीजीएमओमध्ये चर्चा झाली आहे, तसेच दोन्ही डीजीएमओंनी याला मान्यता दिल्याचेही भारतीय लष्कराने सांगितले आहे.
भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे. गेल्या तासभरापूर्वीच पाकिस्तानच्या डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी हॉटलाईन मशीनद्वारे संपर्क साधला होता. यामध्ये दोन्ही डीजीएमओंनी सीमेवरील आणि आसपासच्या परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी २००३ मधील युद्धबंदी लागू करण्याविषयी चर्चा झाली. याला दोन्ही डीजीएमओंनी आपला होकार दर्शवला व यापुढे दोन्ही पक्षांकडून सीमेवर गोळीबार केला जाणार नाही, अशी कबुली दिली. तसेच सीमेवर कोणतीही घटना घडल्यास त्याविषयी दोन्ही सैन्येमध्ये चर्चा करून आणि माहितीची देवाणघेवाण करूनच तोडगा काढला जावा, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली. याला देखील भारताने होकार देत युद्धबंदी लागू करण्यास आपली देखील तयारी दर्शवली आहे.
रमजान महिन्याच्या सुरुवातीपासून पाकिस्तान सैन्याने नियंत्रण रेषेवर तुफान गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये त्यावेळी १ बीएसएफ जवान आणि १० नागरिक मृत्युमुखी पडले होते. पाकिस्तानच्या या कृतीवर भारतीय लष्कराने देखील जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबारासह पाकिस्तान सैन्येवर थेट रॉकेटने हल्ला चढवला होता. यामध्ये पाकिस्तानचे काही बंकर आणि सैन्य ठार झाले होते. यावर पाकिस्तानने भारताला गोळीबार थांबवण्याची विनंती केली होती व त्यानंतर आज थेट चर्चा करत स्वतःहून युद्धबंदी लागू करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचा हा एक मोठा विजय मानला जात आहे.