नवी दिल्ली : "दहशतवाद आणि संवाद एकत्र शक्यच नाहीये. आजपर्यंत भारताने पाकिस्तानसोबत संवाद साधत प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र जर पाकिस्तान सतत दहशतवादाला थारा देत असेल तर अशा परिस्थितीत सुसंवाद शक्यच नाही. जेव्हा सीमेवर जवान शहीद होत असतात, त्यावेळी संवादाचा आवाज योग्य नाही." असे वक्तव्य परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज केले. मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमिच्चाने परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
डोकलामच्या परिस्थितीत बदल नाही :
यावेळी सुषमा स्वराज यांनी एक मोठे विधान करत सांगितले की डोकलाम येथील परिस्थीत काहीच बदल झालेला नाही. आता तिथे सैन्य कारवाई होत नसली तरी देखील परिस्थीत पूर्वी सारखीच आहे. "मी पुन्हा एकदा सांगते डोकलामच्या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही." अशा शब्दात त्यांनी हे वक्तव्य केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या गेल्या ४ वर्षातील यशावरील पुस्तकाचे प्रदर्शन :
यावेळी सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या गेल्या ४ वर्षातील यशावरील आधारित एका पुस्तकाचे प्रदर्शन केले. यामध्ये ४ वर्षात परराष्ट्र मंत्रालयाने काय काय केले याविषयी माहिती आहे. जगातील अनेक देश असे आहेत, जिथे आतापर्यंत भारतातील मंत्री पोहोचलेले नाहीत. आम्ही मंत्रीस्तरीय वार्तालाप करण्यासाठी या देशांना भेट देऊ इच्छितो. आता पर्यंत १९२ पैकी १८६ देशांना भेट देण्यात आली आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
जगातील ९० हजार लोकांना मायदेशी परत आणले :
यावेळी त्यांनी गेल्या १ वर्षातील केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या यशाबद्दल सांगत माहिती दिली की, आता पर्यंत परराष्ट्रांमध्ये अडकलेल्या ९० हजार लोकांना मायदेशी परत आणण्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला यश मिळाले आहे. अनेक नागरिकांना मिळालेल्या दंडात देखील कमी करण्यात आली आहे, तर अनेकांना दंडापासून वाचविण्यात आले आहे. देशात भाजपची सत्ता येण्याआधी केवळ ७७ पारपत्र केंद्र (पासपोर्ट केंद्र) होते. मात्र आता त्यांची संख्या वाढवून २२७ करण्यात आली आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.